नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज तब्बल २ हजार ३२९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उदघाटन केले. यावेळी मोदींनी ‘निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत आहे यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन’ असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन करत पंतप्रधान मोदींनी योगी सरकारचे तोंडभरून कौतुक केले आहे. “उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की योगीनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. तेव्हा योगीजी मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आज लोक पाहत आहेत योगींनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले, असे पंतप्रधान म्हणाले.
“जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते, तेव्हा हे असे काम होते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का? हे पूर्वी का झाले नाही आणि आता का होत आहे, याचे एकच कारण आहे, राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्य,” असे मोदी म्हणाले.
“सात वर्षांपूर्वी दिल्लीत सरकार होते आणि चार वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये सरकार होते, त्यांनी पूर्वांचलमध्ये काय केले? जे आधी सरकारमध्ये होते, ते कुठेतरी दवाखाना, कुठेतरी छोटेसे हॉस्पिटल जाहीर करून मतांसाठी बसायचे. वर्षानुवर्षे, एकही इमारत बांधली गेली नाही. जर इमारत होती, तेथे मशीन्स नव्हत्या, जर दोन्ही केले तर डॉक्टर आणि इतर कर्मचारी नव्हते. गरिबांचे हजारो कोटी रुपये लुटणारे भ्रष्टाचाराची सायकल चोवीस तास चालायची,” असे मोदी म्हणाले.
“योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या आधीच्या सरकारने आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेशमध्ये फक्त सहा वैद्यकीय महाविद्यालये बांधली होती. योगींच्या कार्यकाळात १६ वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली असून ३० नवीन वैद्यकीय महाविद्यालयांवर वेगाने काम सुरू आहे,” असे मोदी म्हणाले.