यवतमाळ – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे डबल इंजिनाची डबल गॅरंटी आहे. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३,८०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. पीएम किसान सन्मान निधीचे दर वर्षी १२ हजार रुपये मिळत आहेत. किसान सन्मान निधीअंतर्गत केंद्र सरकारने ३ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे छोट्या शेतकऱ्यांच्या कामी येत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) म्हणाले.
यवतमाळ जवळच्या भारी शिवारात बुधवारी महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधीचे वितरण करण्यात आले. तसेच या ठिकाणी विविध योजनांचे लोकार्पण केले.
नरेंद्र मोदी म्हणाले, एनडीए सरकारच्या काळात देशात मोठा विकास झाला आहे. परंतु, याआधीच्या सरकारच्या काळात काय होत होते ते एकदा आठवून पाहा. तेव्हाचे कृषीमंत्रीदेखील या महाराष्ट्राचे होते. त्या वेळी दिल्लीमधून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावाने पॅकेज घोषित केले जायचे. परंतु, ते पॅकेजमध्येच लुटले जात होते. गावागावांमध्ये गरीब शेतकरी आणि आदिवासींना काहीच मिळत नव्हते. परंतु, आजची परिस्थिती बघा. मी एक बटण दाबले आणि बघता बघता पीएम किसान सन्मान निधीचे २१,००० कोटी रुपये देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. हीच मोदींची गॅरंटी आहे.
काँग्रेसचे सरकार असताना दिल्लीतून एक रुपया निघायचा आणि तो रुपया लोकांकडे पोहेचेपर्यंत त्यातले केवळ १५ पैसे उरायचे. आज काँग्रेसचे सरकार असते तर जे २१ हजार कोटी रुपये आज शेतकऱ्यांना मिळाले आहेत, त्यापैकी १८ हजार कोटी मध्येच लुटले गेले असते आणि केवळ तीन हजार कोटी लोकांना मिळाले असते. परंतु, आता भाजप सरकारच्या काळात गरिबांचे सर्व पैसे त्यांना मिळत आहेत. हीच मोदींची गॅरंटी आहे. प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
– यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांसह महिलांना कोणत्याही योजनेचा पूर्ण लाभ मिळत नव्हता. महाराष्ट्रातील कृषीमंत्री केंद्रात होते. तेव्हा केंद्रात युपीएचे भ्रष्ट्र सरकार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीच थेट लाभ मिळाला नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
– मोदींनी “जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा” असे अभिवादन करून भाषणाला मराठीत सुरुवात.
– 2024 मध्ये देशात एकच आवाज आहे, अब की बार 400 पार.
– आम्ही शिवाजी महाराजांना मानणारे लोकं आहोत. शिवाजी महाराजांनी नेहमी देशाची चेतना जागी करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत.
– देशाच्या प्रत्येक कोपऱ्याला विकसित बनवण्याचं माझं स्वप्न आहे.
– चार प्राधान्य घटक आहे. गरीब , युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले तर देश विकसित होईल. आज या चारही घटकांसाठी काम झाले आहे व सातत्याने होत राहील.
– आज मी एक बटण दाबले आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी एवढी मोठी रक्कम पोहोचली आहे. हीच तर मोदींची गॅरंटी आहे. हेच काँग्रेस शासन असते, तर 21 हजार कोटी पैकी 18 हजार कोटी खाऊन टाकले असते.
– 800 करोड पेक्षा अधिक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे.
– महिलांना ड्रोन पायलटचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– पंडित दिनदयाल उपाध्याय यांचे जीवन गरीबांच्या विकासासाठी राहिले पाहिजे.
– ज्यांना कोणी विचारले नाही त्यांना मोदींनी विचारले अन् पूजनही केले.
– कॉंग्रेस काळात आदिवासीसह अन्य नेत्यांना लाभ मिळत नव्हते.
– ऊसाच्या एफआरपीमध्ये देखील वाढ होत आहे.
– देशातील गावागावांचा विकास होत आहे.
– आधी एखाद्या गावात शंभर पैकी फक्त 15 गावांमध्ये नळाने पाणी येत असे. आता 75 पेक्षा जास्त घरांमध्ये नळाने पाणी देत आहेत. तेव्हाच लोक म्हणतात ही मोदींची गॅरंटी.
– प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हीच मोदी गॅरंटी.
– भाजप सरकारमध्ये गरीबांचा पूर्ण पैसा गरीबांना मिळत आहे,
– भारताला विकसीत बनविण्यासाठी गरीब, किसान, जवान आणि नारीशक्ती हे चार सशक्त झाले तर सर्व देश, प्रत्येक घर सशक्त होईल.
– या ठिकाणी यवतमाळ मध्ये हजारो करोडो रुपयांच्या कामांचा शिल्यानास व लोकार्पण झाला आहे. गरींबांना मजबूत घर मिळत आहेत.
– सगळीकडे लोक आता म्हणत आहे की, अब की पार 400 पार.