कोलकाता – ममता बॅनर्जी यांच्या सरकारमुळे पश्चिम बंगाल मध्ये कम्युनिझमचाच पुन्हा उदय झाला असून राजकारणाचे गुन्हेगारीकरणे आणि प्रशासनाचे राजकारण यामुळेच पश्चिम बंगाल राज्याची बिकट स्थिती निर्माण झाली आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल मधील हल्दिया येथील एका सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. ते म्हणाले की, राज्यात बेसुमार भ्रष्टाचार वाढला असून राज्यातील नैसर्गिक आपत्तीतही भ्रष्टाचाराची संधी शोधली जात आहे. पश्चिम बंगाल मध्ये अमफन सारखे चक्रीवादळ झाल्यानंतर केंद्र सरकारने पश्चिम बंगालला रेशनचा मोफत पुरवठा केला पण राज्य सरकारने ते गरजूंपर्यंत पोहचू दिले नाही.
या भ्रष्ट कारभारात शेवटी न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आहे असा दावाहीं मोदींनी यावेळी केला. कोविड सारख्या काळातही राज्यातील शेतकऱ्यांना निधी मिळू शकला नाही. केंद्र सरकारची किसान सन्मान योजना राज्यात लागू केली गेली नाही त्यामुळे केंद्राने मंजुर केलेले पैसे या राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींची गेल्या दोन आठवड्यांमधील ही दुसरी बंगाल भेट होती. त्यांच्या हस्ते आज या राज्यांतील काही प्रकल्पांचे उद्घाटन झाले.