मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, व मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतीच राजधानी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, मेट्रो कारशेड यासह १२ मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा केली.
मात्र यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंद दरवाज्याआड एकांतात चर्चा केली. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
या सर्व प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शरद पायावर यांनी बाळासाहेबांची आठवण काढत शिवसेनेबाबत ज्या प्रकारच्या चर्चा सुरु आहेत, तसं काहीही होणार नाही असा विश्वास व्यक्त केला. ते पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
काय म्हणाले शरद पवार…
काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला…. तो म्हणजे शिवसेना
“शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहत आहे. माझा यासंबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्यावेळी जनता पक्षाचं राज्य आलं त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला….तो म्हणजे शिवसेना.”
तर तसं होणार नाही…
“नुसते पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेना एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा करणार नाही असा निर्णय घेतला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा. पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवत पाळला. त्यामुळे कोणी काहीही शंका घेतली तरी शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.