नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दोहा येथील आमीरी पॅलेसमध्ये कतारचे आमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. पंतप्रधानांचे आगमन होताच आमीरी पॅलेसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी शिष्टमंडळ स्तरावर आणि खाजगी बैठक झाली. यावेळी आर्थिक सहकार्य, गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य , अंतराळ सहयोग, शहरी पायाभूत सुविधा, सांस्कृतिक बंध आणि लोकांमधील परस्पर संबंध यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उभय नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचार विनिमय केला.
कतारमधील ८ लाखांहून अधिक सशक्त भारतीय समुदायाची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आमीरांचे आभार मानले आणि कतारसोबतचे द्विपक्षीय सहकार्य आणखी विस्तारण्यासाठी आणि दृढ करण्यासाठी भारताची वचनबद्धता व्यक्त केली.त्यांनी अमीर यांना लवकरच भारताला भेट देण्याचे निमंत्रण दिले. आमिरी पॅलेसमध्ये या बैठकीनंतर पंतप्रधानांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
पंतप्रधान मोदी यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची देखील भेट घेतली. हा त्यांचा कतार दौऱ्यातील पहिला कार्यक्रम होता. दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अर्थ आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या विस्तारावर विचारांची देवाणघेवाण केली. पश्चिम आशियामधील अलीकडच्या काळातील घडामोडींवर देखील त्यांनी चर्चा केली आणि या भागात आणि त्या पलीकडे शांतता आणि स्थैर्य टिकवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.
तत्पूर्वी कतारच्या अधिकृत दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दोहा येथे आगमन झाले. पंतप्रधानांची ही दुसरी कतार भेट आहे, याआधी जून 2016 मध्ये पंतप्रधानांनी कतारला भेट दिली होती. कतारचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री सुलतान अल-मुरैकी यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले.
विद्यमान आमीर यांच्या पित्याची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी दोहा येथे फादर अमीर (विद्यमान आमिर यांचे पिता) हमद बिन खलिफा अल थानी यांची भेट घेतली. गेल्या दशकात कतारच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या फादर आमीर यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत- कतार संबंधांबाबत चर्चा केली.
प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींबाबत फादर अमीर यांनी व्यक्त केलेल्या अनुभवी निरीक्षणांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. भारत आणि कतार यांच्या दरम्यान असलेला अतूट बंध म्हणजे परस्पर विश्वास आणि सहकार्य यांचे प्रतीक आहे असे फादर अमीर म्हणाले. कतारच्या विकासात तसेच द्विपक्षीय भागीदारी वाढवण्यात भारतीय समुदायाने बजावलेल्या भूमिकेची देखील त्यांनी प्रशंसा केली.