सातारा, (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था व सहकारातील काम आदर्शवत व प्रेरणादायी आहे. बँकेने विकासाभिमुख उपक्रम राबविलेले आहेत. ग्रामीण भागातील सभासदांच्या कल्याणासाठी व देशाच्या कृषी उत्पादनात भरघोस वाढीसाठी सहकाराच्या माध्यमातून उत्कृष्ट कामकाज केलेचे पहावयास मिळाले.
बँकेच्या विविध नाविन्यपूर्ण योजना व उत्कृष्ठ कार्यप्रणाली, नफ्यातून केलेल्या तरतुदी व बँकिग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख केलेले कामकाज हे देशातील सहकारी बँकांसाठी आदर्शवत असल्याचे प्रतिपादन हिमाचल प्रदेशचे सहकारी संस्थाचे सहकाय आयुक्त संदीप कदम यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दैदित्यमान व दिशादर्शक असलेली कार्यप्रणाली व बँक करीत असलेल्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे यांचेमार्फत हिमाचल प्रदेशच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या शिष्ठमंडळाने भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हिमाचल प्रदेश, सह निबंधक रजनीश कुमार, जिल्हा उपनिबंधक प्रत्युष चौहान, हिमाचल प्रदेश राज्य सहकारी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक गुरचरण सिंग, राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापक अजय सिंग संधू यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी बँकेचे संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बँक रिजर्व्ह बँक व नाबार्डचे नियमांचे तंतोतंत पालन करून कामकाज करीत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बँकेच्या 319 शाखा आणि शाखा सलग्न 960 सोसायट्याच्या माध्यमातून सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क असून बँकेच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी बँक सदैव प्रयत्नशील आहे. बँक स्थापनेपासून सतत नफ्यात असून बँकेची वसुली 99 टक्केपर्यंत आहे.
डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी गत सात दशकातील सातारा जिल्हा बँकेची यशस्वी वाटचाल विषद केली. यावेळी राजीव गाढवे व राजेंद्र भिलारे यांनी हिमाचल प्रदेश येथील सहकारी बँकेच्या कामकाज अनुषंगाने सर्वंकष माहिती घेतली. तसेच मान्यवरांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. यावेळी मान्यवरांनी बँक संलग्न नागठाणे विकास सेवा सोसायटी ता. सातारा येथे भेट देऊन, जिल्हा बँकेच्या अर्थसहाय्याने केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची माहिती घेतली.
मा. श्रीमती रश्मी दराड म्हणाल्या, सातारा जिल्हा बँक आर्थिकदृष्टया सक्षम आहे. बँकेने शैक्षणिक कर्ज, अॅग्रो टूरिझम, महिला बचतगट, फार्मर्स क्लब, गृहकर्ज, वाहन कर्ज, शुगर फॅक्टरी इ. योजनांच्या माध्यमातून चांगले कामकाज केलेले आहे. बँक शासनाच्या अनुदान योजनाही चांगल्या प्रकारे राबवित आहे. बँकेचे संचालक मंडळ, व्यवस्थापन, प्रशासन अत्यंत अभ्यासू असून योजनांची प्रभावीपणे अंमबजावणी केली जाते म्हणूनच नाबार्ड कोणत्याही नवीन योजनांची सुरुवात करावयाची असल्यास जिल्हा बँकेच्या माध्यमातून करत आहे.
नाबार्डचे बँकेला चांगले सहकार्य असून तपासणीमध्ये टॉप रेटींग मिळालेबद्दल नाबार्डचे आभार मानले. बँकेचे एकूण कामकाज चांगले असलेमुळे नाबार्ड व त्याच बरोबर इतर विविध संस्थांचे 100 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झालेले असून बँक देशात अग्रगण्य आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतील विकास संस्थांच्या विचार केला तर सातारा जिल्ह्यातील विकास संस्थांचे कामकाज चांगले असून 954 पैकी 940 विकास संस्था नफ्यात आहेत.
राजेंद्र भिलारे यांनी बँकेचे कामकाज अनुषंगाने असणा-या अडचणी सहकार कार्यालय व नाबार्डकडून सोडविल्या जातील व त्यांच्याकडून बँकेला नेहमीच चांगले सहकार्य व मार्गदर्शन लाभलेले आहे असे सांगितले.