नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्या नागरिकांचा आवाज दडपण्यासाठी भाजप सरकार दडपशाही करत आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी शनिवारी केला.
लोकशाहीसाठी हा काळा दिवस असल्याची टीकाही प्रियांका गांधी यांनी केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे ‘कट ऑफ डेट’ निश्चित होईल आणि प्रत्येक भारतीयांना काही वैध कागदपत्र सादर करून आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागेल. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर स्वत: च्या पैशासाठी एटीएमपुढे रांगेत उभे राहावे लागले होते.
त्याप्रमाणेच गरीब आणि वंचित लोकांना ओळखीच्या पुराव्यांसाठी रांगेत उभे राहण्याचा त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधासाठी देशभर शांततेने निषेध करणाऱ्या आंदोलकांना पोलिसच भडकावत आहेत आणि हिंसाचार घडवत आहेत.
उत्तर प्रदेशात अटक केलेल्यांना पोलीस बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवत आहेत. विद्यार्थी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वकिल आणि पत्रकारंणा बेकायदेशीरपणे अटक केली जात आहे. “एनआरसी’ आणि “का’ हे कायदे राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांविरोधात आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवरील हल्ला कधीही सहन केल जाणार नाही, असे प्रियांका गांधी यांनी हिंदीतून प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आंदोलकांनी महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.