शिवसेनेची रोखठोक भूमिका: वाटाघाटींसाठी दरवाजा बंद केल्याचे स्पष्ट
मुंबई : भाजपशी आता कोणतेही नाते उरलेले नाही. नात्यांचेही तसे ओझेच होते. तेही उतरले, अशी रोखठोक भूमिका शिवसेनेकडून मांडण्यात आली आहे. त्यातून भाजपसाठी दरवाजा बंद केल्याचे त्या पक्षाने सूचित केले आहे.
महाराष्ट्रात प्रचंड राजकीय उलथापालथी घडून शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांची युती तुटली. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले.मात्र, त्यानंतरही शिवसेनेशी वाटाघाटीस तयार असल्याची वक्तव्ये भाजपच्या गोटातून केली जात आहेत.
त्याचा संदर्भ देऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.शिवसेनेने भाजपचे 30 वर्षांचे ओझे फेकून दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. भाजपची सत्ता एकदाची गेल्यामुळे महाराष्ट्राच्या मनावरील ओझेही उतरले असल्याचा शाब्दिक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही शिवसेनेकडून जोरदार शाब्दिक बाण सोडण्यात आले आहेत. कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे वचन आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते का, असा प्रश्न फडणवीस यांनी उद्धव यांना विचारला.
फडणवीस यांच्या मानगुटीवर अद्याप सत्तेचे भूत स्वार आहे. कॉंग्रेसमधून टनावारी माणसे फोडून सत्ता मिळवायची हे ज्यांना चालते; त्यांनी तशी विधाने करण्याच्या भानगडीत पडू नये. भाजपला भारत जलाओ पक्ष म्हणणारे रामविलास पासवान सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत.
मोदी यांच्यावर खालच्या शब्दांत टीका करणारे नितीश कुमार हे बिहारमध्ये भाजपच्या टेकूवर मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे कुणी कोणावर बोलायचे, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे.