नवी दिल्ली – निसर्ग मातेला सध्या अत्यंत क्लेषदायक परिस्थितीला सामोरे जावे लागते आहे. पर्यावरणाशी संबंधित आपत्ती यापुढच्या काळात आपल्या पृथ्वीला मोठा धोका ठरू शकणार आहेत. त्यामुळे सर्वांनी आपल्या भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संवर्धन करावे, अशी अपेक्षा मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना उद्देशून केलेल्या आपल्या निरोपाच्या भाषणात व्यक्त केली. नियोजित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उद्या राष्ट्रपतीपदी शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी देशवासियांशी राष्ट्रपती कोविंद यांनी अखेरचा संवाद साधला आहे.
21 वे शतक हे भारताचे शतक बनण्यासाठीची तयारी भारत करत आहे, यावर राष्ट्रपतींनी विशेष भर दिला. शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रांचे महत्व अधिक आहे. याशिवाय आर्थिक सुधारणा केल्यामुळेच देशवासियांना आपल्या क्षमतांचा शोध घेणे शक्य होईल, असे राष्ट्रपती म्हणाले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे युवकांना आपल्या वारस्याशी जोडले जाईल. त्याचबरोबर त्यांचे 21 व्या शतकाशीही नाते दृढ होईल, अशी आशाही कोविंद यांनी व्यक्त केली. आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी योगदान देणाऱ्या अनेकांचे स्मरण आज होत नाही, अशी खंतही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
आपल्याला पुढील पिढ्यांसाठी आपले पर्यावरण, भूमी, हवा और पाण्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आपली दिनचर्या तसेच दैनंदिन आयुष्यातील गोष्टींचा वापर करताना आपल्याला आपले वृक्ष, नद्या, समुद्र आणि पर्वतांसोबतच इतर सर्व जीव-जंतूंच्या, प्राण्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रींचाही राष्ट्रपतींनी गौरवाने उल्लेख केला. या त्रिसुत्रींना अमूर्त समजले जाऊ नये. आपल्या इतिहासातूनच ही त्रिसूत्री सत्य असल्याची आपल्याला अनुभूती येते. आपल्या पूर्वजांनीच न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुतेच्या तत्वांचे उदाहरण दिले आहे. आपल्याला केवळ त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचे आहे. जीवनाचा खरा आनंद शोधणे हे सर्वसामान्य नागरिकाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मूलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रपतींनी यावेळी लोकशाहीच्या अंगभूत शक्तींचीही उजळणी केली. स्वातंत्र्यानंतर देशात नवनिर्मितीची प्रचंड उर्जा होती. आपल्यालाही देशसेवेची प्रचंड उर्मी होती. असे सांगून राष्ट्रपतींनी पाराउंख गावात आपल्यावर झालेल्या देशभक्तीच्या संस्कारांचा आदराने उल्लेख केला.
देशवासियांना चांगली घरे, प्रत्येक कुटुंबाला पिण्यायोग्य पाणी आणि वीज मिळायला हवी. हा बदल आपल्याला भेदभावविरहीत चांगल्या प्रशासनाने बघायला मिळतो आहे. लोकशाहीचा मार्ग अनुसरण्यासाठी घटनासमितीने आखून दिलेल्या मार्गदर्शक मूल्यांचे मार्गदर्शन ठरावे, अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली. असे सांगताना “स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेला जीवनाची मूल्ये मानणारी जीवनप्रणाली सामाजिक लोकशाही आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारही राष्ट्रपतींनी उद्धृत केले.