सातारा – करंजे तर्फ रामकुंड येथील बळीराजा सामाजिक संस्थेच्या वतीने तामजाईनगर येथे आयोजित केलल्या कवी संमेलनात अनेक कवींनी सहभाग नोंदवत प्रबोधनपर कविता सादर केल्या. उत्साहात पार पडलेल्या या कवी संमेलनाचा प्रारंभ मुंबई उच्चन्यायालयाचे ऍड. महेंद्र गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कवी प्रा. शिवाजीराव लेंभे, बळीराजा संस्थेचे अध्यक्ष गौतम भोसले, कवी ऍड. संगीता केंजळे यांची उपस्थिती होती.
या संमेलनात हणमंत माने, आनंदा ननावरे, ऍड. प्रभाकर कांबळे, शीला जाधव, प्रकाश वाघमारे, ऍड. संगीता केंजळे, कांता भोसले, सुहास मोरे, गौतम भोसले, स्वाती मोरे, प्रा. शिवाजीराव लेंभे यांनी कविता सादर केल्या. अनेक कवींनी हुंडाबळी, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुण हत्या, माहेरच्या आठवणी, निसर्ग, आई, पाऊस, शेतकरी आत्महत्या, पंढरीची वारी, माणूस, भारत देश, सासू आणि सून, अशा अनेक विषयावर कविता सादर करून प्रबोधनाचे काम केले. कवितेतून समाज घडविण्याचे सामर्थ्य असते, असे मत ऍड. गाडे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ कवी प्रा. शिवाजीराव लेंभे यांनी त्यांच्या भाषणात समाजातील विविध विषयावर प्रकाशझोत टाकला. यावेळी बळीराजा सामाजिक संस्थेच्या कार्याध्यक्षा कुसुमताई भोसले यांनी संस्थेच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. बळीराजा संस्था शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत काम करते, शाहू- फुले आंबेडकर यांच्या विचारांची पाठराखण करीत काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, महिला मेळावा, विविध स्पर्धा असे विविध उपक्रम 14 वर्षांपासून राबवित असल्याची माहिती भोसले यांनी दिली. पुढील काळात स्त्री भ्रुण हत्येसंदर्भात जनजागृती करण्याबरोबरच आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संगीता केंजळे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन सुहास मोरे यांनी केले. तर आभार स्वाती मोरे यांनी मानले.