कर्जत – कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये मका, बाजरी, ज्वारी, कांदा, सोयाबीन, ऊस आदी पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागाचा दौरा करून रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
ऑक्टोबर महिन्यात सतत पाऊस झाल्याने रानात तुडुंब पाणी साठले. यामध्ये अनेक पिके सडून गेली आहेत. पिकात साचलेल्या पाण्याने शेतकरी त्याची काढणी करू शकले नाहीत. पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून पुर्ण भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पवार यांच्याकडे केली. यावेळी पवार यांनी खेड येथील रामदास मोरे यांच्या नुकसानग्रस्त कांदा पिकाची पाहणी करत संवाद साधला.
पावसाने कांदा पिकाचे नुकसान झाले असून खुप मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे मोरे यांनी सांगितले. शासनस्तरावरून निश्चितच नुकसानभरपाई मिळेल असा विश्वास रोहित पवार यांनी दिला. औटेवाडी, आखोणी, करपडी, बाभुळगाव, येसवडी, बारडगाव, भांबोरा, दूधोडी, राक्षसवाडी, धालवडी, कुळधरण,कोपर्डी, शिंदे, नांदगाव, रेहकुरी, माहीजळगाव आदी ठिकाणी जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तसेच विविध शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थ व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.