पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दि. 25 मेपासून प्रवेश अर्ज भाग-1, तर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-2 भरता येणार असून यात कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. यासाठी पाच दिवसांची मुदतही दिली जाणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या व दोन विशेष फेऱ्या राबविण्याचे नियोजित आहे. यंदा “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही फेरी होणार नाही. पहिली विशेष फेरी झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू करता येणार आहेत. मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अगोदरच काढून ठेवण्याबाबत जागृत करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत संबंधित महसूल यंत्रणेकडे विनंतीही करण्यात येणार आहे. दरम्यान, विद्यार्थी, पालकांसाठी मार्गदर्शन वर्ग, प्रशिक्षणाचेही आयोजन केले जाणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी सांगितले.
संभाव्य वेळापत्रक
दि. 20 ते 24 मे ः विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-1 भरण्याचा सराव करता येणार.
दि. 25 मेपासून दहावीचा निकाल लागेपर्यंत ः विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी सुविधा उपलब्ध.
दि. 25 मेपासून दहावीच्या निकालानंतर दोन दिवसपर्यंत ः विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जातील माहिती, भाग-1 ऑनलाइन तपासून प्रमाणित करणे.
दि. 20 मेपासून दहावीचा निकाल लागेपर्यंत ः कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करुन त्यांची माहिती तपासून ती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून प्रमाणित करुन घेणे.