राजेंद्र भुजबळ
शिर्डी – साई संस्थान विश्वस्तपदासाठी 250 अर्ज दाखल झाले असून, विश्वस्त पदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत साईभक्तांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. साई संस्थान विश्वस्तपदासाठी आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारला शिर्डी साई संस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेसाठी ठराविक कालावधी दिलेला आहे.
विशेष म्हणजे सन 2012नंतर साई संस्थान विश्वस्त मंडळ कोणत्या ना कोणत्या कारणाने बरखास्त करण्याची नामुष्की सरकारवर आल्याने आता इच्छुक असलेल्या नागरिकांनी साई संस्थानमध्ये अर्ज भरून ते जमा केले आहे. याचिकाकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी मा. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या विरोधात जनहित याचिका केल्या आहेत.
यात विशेष म्हणजे विश्वस्त मंडळ स्थापन करताना नियम, कायदा व घटना यांचं उल्लंघन झालं असल्याचं काळे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे या वेळी कोणतीही चूक अथवा त्रुटी राहू नये, म्हणून विश्वस्त पदासाठी असणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्रथम साई संस्थानची समिती बारकाईने सर्व बाबी तपासूनच हे अर्ज राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविणार आहे. त्याठिकाणी उच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत सर्व अर्जांची तपासणी होऊन तेच नवीन विश्वस्त नेमणार आहेत.
विश्वस्त होण्यासाठी अनेक अटी व शर्ती, तसेच कायदा आहे. त्यात प्रामुख्याने एकदा विश्वस्त झालेल्या उमेदवाराला दुसऱ्यांदा विश्वस्त होता येणार नाही, राजकीय पद अथवा राजकीय उमेदवारांचे पुनर्वसन करण्यासाठी त्याची नियुक्ती करता येणार नाही, शैक्षणिक पात्रता अर्थात पदवीधर, चारित्र्य संपन्न, अभियंता, वकील, डॉक्टर, सामजिक संघटनेचा पदाधिकारी अथवा संस्थापक, आर्किटेक्ट, एमबीए यासारख्या पदवीधर उमेदवारांना कमीत कमी दहा वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे असं नियमावलीत नमूद आहे. त्यामुळे आता 250 अर्जांपैकी पैकी 17 विश्वस्त नेमके कोण होणार? याची उत्सुकता साईभक्तांना लागली असून, याचे उत्तर काही दिवसांतच स्पष्ट होईल.
“साई संस्थानच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे राज्यातील अनेकांनी आपापल्या पद्धतीने राजकीय “फिल्डिंग’ लावली असून, तिचा फायदा होणार नसल्याचं बोललं जात आहे. एक पारदर्शक, चारित्र्य संपन्न, सुशिक्षित असं विश्वस्त मंडळ साईंच्या पुण्यनगरीला लाभावे हीच आमची इच्छा आहे,” असे साईभक्त प्रदीप सारोळकर म्हणाले.