फलटण – राज्यभरासह जिल्ह्यात रविवारी आलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, असे आदेश महसूल व कृषी विभागाला राज्य शासनाने दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग तयारीत आहे, परंतु महसूल विभागाकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनीच प्रांताधिकाऱ्यांना आदेश देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
फलटण तालुक्यात हवामानातील बदल, अतिवृष्टी, यासह इतर नैसर्गिक बाबीमुळे रब्बीचा पेरा उशीरा झाल्याने प्रामुख्याने गव्हाची वाढ समाधानकारक झाली नाही. त्यातच रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
अवकाळी पावसाने तालुक्यातील जिंती, होळ, सांगवी, सोनगाव, सोमंथळी, धुळदेव, अलगुडेवाडी, सस्तेवाडी, कांबळेश्वर, खुंटे, गुणवरे, गोखळी, ढवळेवाडी, खटकेवस्ती, निंबळक, शिंदेनगर, मठाचीवाडी, आसू, राजाळे, साठे, सरडे आदी गावातील सुमारे 390 हेक्टर क्षेत्रातील गहू, मका, कडवळ, भाजीपाला आदी पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. सदर आकडेवारी नजर अंदाजानुसार असून आगामी दोन दिवसात प्रत्यक्ष पंचनामे करुन नुकसानीची माहिती संकलित करुन शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे यांनी सांगितले.
तर तहसिलदार विना असलेल्या महसूल खात्याने माहिती सांगण्याससुद्धा असमर्थता व्यक्त केली. तालुक्यात गव्हाचे 326 हेक्टर, हरभरा 7 हेक्टर, मका 48 हेक्टर, कडवळ 7 हेक्टर, भाजीपाला 2 हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकांचे नुकसान झाले असून प्रत्यक्ष पंचनामे केल्यानंतर निश्चित आकडेवारी समोर येणार असल्याचे डोईफोडे यांनी स्पष्ट केले.