शिक्रापूर -विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील दहावीची परीक्षा म्हणजे महत्त्वाचा टप्पा असते. या परीक्षेवर मुलांचे पुढील भवितव्य अवलंबून असते, त्यामुळे मुलांनी परीक्षाकाळामध्ये आरोग्याकडे लक्ष देत भयमुक्त वातावरणात सामोरे गेले पाहिजे, असे मत जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी व्यक्त केले.
दहावीच्या परीक्षा केंद्राच्या शिक्रापूर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत असताना कुसुम मांढरे बोलत होत्या. यावेळी सरपंच जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्या जयश्री दोरगे, उद्योजक काकासाहेब चव्हाण, विद्यालयाचे प्राचार्य रामदास शिंदे, उपप्राचार्य रामदास चव्हाण, पर्यवेक्षक सुभाष पाचकर, केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, प्रा. सुनील दिवटे, प्रा. नानासाहेब गावडे, संतोष परदेशी यांसह आदी उपस्थित होते.
शिक्रापूर परीक्षा केंद्रावर विद्याधाम प्रशाला शिक्रापूर, माध्यमिक विद्यालय सणसवाडी, श्री मंगलमूर्ती माध्यमिक विद्यालय रांजणगाव गणपती, काळभैरवनाथ विद्यालय कोयाळी पुनर्वसन, अजिंक्यतारा इंग्लिश मीडियम स्कूल शिक्रापूर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी या सहा शाळांचे मिळून एकूण 803 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले असल्याची माहिती केंद्र संचालक रामभाऊ चव्हाण यांनी दिली आहे.
यावेळी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सरपंच जयश्री भुजबळ यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रांचालन प्रा. सुनील दिवटे यांनी केले. प्रा. नानासाहेब गावडे यांनी आभार मानले.