पुणे – अनेक घटनांतून, प्रसंगातून असे दिसून येते की महिलांविषयीच्या पूर्वग्रहाची सुरुवात ही त्यांच्या कुटुंबव्यवस्थेतूनच होते. त्यामुळेच या महिलादिनाच्या निमित्ताने कुटुंबव्यवस्थेपासून समाजापर्यंत पोहचणारे हे पूर्वग्रह कुटुंबातच मोडीत काढायला हवेत असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अल्युमिनाय असोसिएशनतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त यंदाच्या आंतरराष्ट्रीय संकल्पनेनुसार ‘पूर्वग्रह तोडतांना..’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अल्युमिनाय असोसिएशनचे संचालक डॉ. संजय ढोले उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका, प्राध्यापिका तसेच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सहसचिव जोत्स्ना एकबोटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांच्या शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनुभव सांगितले महिलांनी सक्षम बनुन समाज रचना बदल बदलली पाहिजे असेही जोत्स्ना एकबोटे यांनी सांगितले.
या परिसंवादात व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रा पवार, आयबीएसच्या संचालक प्रा. ज्योती टिळक, प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. अंजली क्षीरसागर, आयक्यूएससीच्या संचालक डॉ. सुप्रिया पाटील, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर आदींनी आपले मत व्यक्त केले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ग्रामीण भागात महिलांविषयीचा चुकीचा पूर्वग्रहही दिसतो, हे बदलायला हवे. तर ज्योती टिळक म्हणाल्या, पुरुष कमावत नाही किंवा किती कमावतो यावर अवलंबून न राहता स्त्रियांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकायला हवे.