लखनौ – उत्तरप्रदेशात इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली जात असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला असून त्यांनी एका कचरा वाहतुकीच्या ट्रक मधून काहीं इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रे दुसरीकडे नेली जात असताना ती पकडली आहेत.
या संबंधात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या मतदान यंत्रांच्या वाहतुकीत योग्य ती दक्षता घेतली गेली नव्हती असे मान्य केले आहे. त्यांचा तशी कबुली देणारा व्हिडीओही सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. तथापि असे असले तरी ईव्हीएम मध्ये कोणतीही छेडछाड केली गेलेली नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये ईव्हीएमशी छेडछाड केली जात असल्याच्या बातम्या आम्हाला मिळत आहेत हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे? मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे का? असे सवाल समाजवादी पक्षाने निवडणूक आयोगाला ट्विटरवर विचारले आहेत. काल मंगळवारी वाराणसीतच ईव्हीएम मशिन घेऊन जाणारा ट्रक पकडला गेला होता.
या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना या बाबत अधिक सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. पक्षाच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रावर पोहोचून तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.