रायगड – छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथील सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. वनसंपदेनं परिपूर्ण असलेल्या किल्ले रायगडावर भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने उत्खनन करण्यात येत आहे. या उत्खननात सोन्याची मौल्यवान बांगडी सापडली आहे. या संदर्भात खुद्द खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी माहिती दिली.
रायगड किल्ल्यावर उत्खनन केले जात आहे. या उत्खननात अनेक दुर्मिळ आणि प्राचीन काळातील वस्तू सापडत आहेत. रायगड प्राधिकरणामार्फत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या उत्खननाचे महत्त्व आज पुन्हा प्रत्येयास आले.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, प्राधिकरणामार्फत गडावर आतापर्यंत झालेल्या उत्खननामध्ये भांडी, नाणी, घरांची वेगवेगळ्या प्रकारची कौलं अशा वस्तू मिळालेल्या आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या उत्खननामध्ये सोन्याच्या धातू पासून बनवलेली पुरातन मौल्यवान बांगडी मिळालेली आहे. अशाप्रकारे पुढेही अनेक ऐतिहासिक वस्तूंसह वेगवेगळे अलंकारही उत्खननात मिळू शकतात. यामुळे गडावरील तत्कालीन राहणीमान, संस्कृती, वास्तूरचना नव्याने समजण्यास मदत होणार आहे. तसेच या वस्तू ज्याठिकाणी मिळतात, त्यावरून त्या ठिकाणाचे वास्तविक महत्त्व व माहिती समजण्यास मोलाची मदत होईल असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.
सध्या गडावर सुरु असलेल उत्खनन भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने चालू आहे, या उत्खननातच या वस्तू मिळत आहेत. या प्रसंगी पुरातत्व खात्याचे विशेष कौतुक करावे, असंही संभाजी म्हणाले.