वाई -प्रतापगड उत्सव समितीने केलेली आंदोलने व लढलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची दखल घेऊन प्रशासनाला अफजलखान कबरीशेजारी असलेले अनधिकृत बांधकाम तोडावे लागले, अशी प्रतिक्रिया प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक वाईतील श्रीमती विजयाताई भोसले यांनी व्यक्त केली.
प्रतापगड उत्सव समितीच्या माध्यमातून गेली 25 वर्षे मिलिंद एकबोटे, विनायक सणस, पंडितराव मोडक, राजीव मोहिते, पोपट बर्गे, सुनील घाडगे, बाबा चव्हाण व वाई शहरातील तसेच महाराष्ट्रातील असंख्य शिवभक्तांना एकत्र घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यासाठी सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर व महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये तेथील स्थानिक कार्यकर्ते व प्रतापगड उत्सव समितीने वेळोवेळी आंदोलने केली.
वाई शहरातील असंख्य शिवभक्तांना एकत्रित करून समितीच्या माध्यमातून अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा केला. प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अँड. नितीन प्रधान, अँड. सौ. जयश्री खोत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून लढा देऊन मुंबईस्थित अफजलखान मेमोरियल ट्रस्टची मान्यता अवैध असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व हा ट्रस्ट रद्द करून घेतला.
त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयात अफजलखान कबरीशेजारी अनधिकृत बांधकाम आहे, हे वेळोवेळी पुराव्यासह कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रतापगड उत्सव समितीने केलेली आंदोलने व लढलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची दखल घेऊन प्रशासनाला त्याठिकाणी असलेले अनधिकृत बांधकाम तोडावे लागले. त्याबद्दल सर्व शिवभक्त व प्रशासनातील महाबळेश्वर, वाई, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई व दिल्ली येथे असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी व मंत्र्यांचे प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने अभिनंदन करते, असे श्रीमती विजयाताई भोसले यांनी सांगितले.