Prakash Solanke – राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्या गाड्यांची देखील जाळपोळ करण्यात आली होती. या घटनेदरम्यान प्रकाश सोळंके घरातच होते. या घटनेनंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना काही आरोपींना अटक केली आहे. यावर प्रकाश सोळंके यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलतांना प्रकाश सोळंके म्हणाले,’मराठा आंदोलकांनी माझा जीव वाचवला. या घटनेसाठी मराठा आंदोलकांना अजिबात दोषी धरत नाही. जमाव मोठा असल्यानं पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नसेल,” असं म्हणत सोळंकेंनी म्हटलं.
दरम्यान पत्रकाराने ‘जाळपोळ रोखण्यात गृहमंत्रालय अपयशी ठरलं का? असा प्रश्न विचारला असता प्रकाश सोळंके म्हणाले, “त्याठिकाणी ५ ते ६ पोलीस अधिकारी उपस्थित होते. जमावापुढे पोलीस काय करणार? पोलिसांनी लाठीहल्ला, हवेत गोळीबार आणि अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या असत्या. पण, जमावावर कारवाई केली असती, तर चिथावणी दिल्यासारखं होईल. म्हणून पोलिसांनी कारवाई केली नसेल.”असेही ते म्हणाले आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माजलगावचे राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने मराठा समाजबांधव आक्रमक झाले आणि त्यांनी सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक आणि जाळपोळ केल्याचे म्हंटले जात आहे.