नवी दिल्ली – आधुनिक जीवनशैलीमुळे येणाऱ्या ताणतणावावर मात करण्यासाठी आणि अ-संसर्गजन्य रोगांपासून (एनसीडी) बचाव करण्यासाठी, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडु यांनी नागरिकांना नियमित योग आणि ध्यान करण्याची सवय तसेच आपल्या पारंपरिक खाद्य सवयी अंगी बाणवण्याचे आवाहन रविवारी केले.
हैदराबाद येथे सोसायटी ऑफ कोरोनरी सर्जन्स यांचा आभासी पद्धतीने प्रारंभ करताना,ते बोलत होते. वैज्ञानिक समुदायाने असा निष्कर्ष काढला आहे की हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांमध्ये वाढ होण्यास अयोग्य जीवनशैली हेच मुख्य कारण आहे. योग केल्यामुळे तणाव दूर होतो आणि रोगाचा त्रास दूर होतो. त्यामुळे, योग हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य दिनक्रम झालाच पाहिजे, त्यांनी नमूद केले.
अ-संसर्गजन्य रोगांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबधी, तीव्र श्वसनाचा रोग, कर्करोग आणि मधुमेह यासारख्या मोठ्या आजारांचा समावेश आहे आणि जगभरात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी जवळजवळ 41 दशलक्ष (71 टक्के) आणि भारतातील सर्व मृत्यूंपैकी 5.87 दशलक्ष (60 टक्के) मृत्यू यामुळे होतात.
अ-संसर्गजन्य आजाराची वाढ ही मुख्यतः बैठे काम करण्याची पद्धत, अनारोग्य आणि अन्नपदार्थ सेवनाच्या अनियमित पद्धती, धूम्रपान आणि तंबाखू खाणे अशा बदललेल्या जीवनशैलीमुळे होते, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. अ-संसर्गजन्य रोगाच्या साथीने व्यक्ती, कुटुंब आणि समाजासाठी विनाशकारी परिणाम घडवून आणले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग (सीव्हीडी) आणि त्यांच्यामुळे लोकांवरील परिणाम आणि त्यादृष्टीने होणारी हानी रोखण्याच्या उद्देशाने सोसायटी ऑफ कोरोनरी सर्जन तयार करण्याच्या पुढाकाराचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. उपराष्ट्रपतींनी एससीएसच्या सदस्यांना ग्रामीण भागावर असलेला रोगांचा ताण यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.