शिरूर-हवेली मतदारसंघात रंगणार भाजप-राष्ट्रवादीत दुरंगी लढत
शिरूर- शिरूर-हवेली (198) विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार अशोक पवार या दोघांनी गुरुवारी (दि. 3) मोठे शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार बाबूराव पाचर्णे व माजी आमदार अशोक पवार या दोघांमध्ये दुरंगी लढत होणार असून या दोघांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आजच दोघांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त ठरवला होता. माजी आमदार अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वैशाली नागवडे, बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे, नगराध्यक्ष वैशाली वाखारे, उद्योगपती आदित्य धारिवाल, बाळासाहेब नरके हे उपस्थित होते होते. तर आमदार बाबूराव पाचर्णे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, रोहिदास उंद्रे हे प्रमुख नेते उपस्थित होते.
शिरूर-हवेली तालुक्यात या उमेदवारांचे शुक्रवारी (दि. 4) मोठे शक्तिप्रदर्शन होईल, असे वाटत असतानाच गुरुवारीच शिरूरमध्ये भाजपा आमदार बाबूराव पाचर्णे यांनी पाबळ फाटा येथून आपल्या शक्तिप्रदर्शनास सुरुवात केली. तर ढोल-ताशा, सनईचा ताफा आणि ढोल पथकाच्या गजराज आणि फटाक्यांची आतषबाजीमध्ये दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे सुपूर्त केले. त्यानंतर साई गार्डन शिरूर येथे भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शिरूर बाजार समिती आवारामध्ये कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मेळाव्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत राष्ट्रवादी कॉंग्रेस जिंदाबाद, अशोक पवार जिंदाबाद अमोल कोल्हे जिंदाबाद अशा घोषणा देत मोठे शक्तिप्रदर्शन करीत शिरूर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे माजी आमदार अशोक पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
- आतापर्यंत 8 उमेदवारांचे 10 अर्ज दाखल
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 54 अर्ज वाटप करण्यात आले असून आठ उमेदवारांनी निवडणूक अधिकारी हेमंत पाटोळे यांच्याकडे 10 अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा वाघोली-आव्हाळवाडी जिल्हा परिषद गटाचे सदस्य माऊली कटके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.