पुणे : राज्यात कोरोनाच्या संकटामुळे वर्षभर शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या. आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मुलांना नियमितपणे शाळेत पाठविण्यासाठी 83 लाख 22 हजार 990 पालकांनी होकार दर्शविला आहे. शालेय शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षण अहवालातुन ही बाब उघड झाली आहे.
गेल्या वर्षातील मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप ही कायम आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेचा विचार करुन शाळा बंदच ठेवून ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवण्यात आले होते. शिक्षण विभागाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने इतरही महत्वाच्या घटकांच्या अनुषंगाने माहिती जमविली आहे. त्यावरुन अहवालही तयार करण्यात आले असून शैक्षणिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी हा डेटा महत्वाचा ठरणार आहे.
कुटूंबाच्या सर्वसाधारण माहितीचे संकलनही करण्यात आले आहे. राज्यात 3 ते 18 या वयोगटात एकूण 1 कोटी 71 लाख 6 हजार 234 बालके आढळून आली आहेत. अंगणवाडीत, बालवाडीत, शाळेत दाखल झालेली बालके 1 कोटी 68 लाख 84 हजार 315 आढळली आहेत. विशेष गरजाधिष्टीत बालके ही 1 लाख 31 हजार 986 आहेत. त्यातील 1 लाख 26 हजार 563 बालके शाळेत प्रविष्ट झालेली आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे इयत्ता पहिली ते पाचवीची 45 लाख 67 हजार 144 बालके शाळेत जाऊ शकले नाहीत. तसेच इयत्ता सहावी ते आठवीची 15 लाख 47 हजार 175 तर इयत्ता नववी ते बारावीची 13 लाख 15 हजार 865 मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर मुलांना नियमितपणे शाळेत पाठविण्याची तयारी आहे का याबाबतही माहिती जमा करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात 13 लाख 43 हजार 452 बालके आहेत. त्यातील 13 लाख 17 हजार 140 शाळेत दाखल आहेत. विशेष गरजाधिष्टीत 7 हजार 565 बालके असून त्यातील 7 हजार 44 शाळेत प्रविष्ट आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते पाचवीची 2 लाख 44 हजार 329 तसेच सहावी ते आठवीची 1 लाख 712, नवीन ते बारावीची 96 हजार 525 मुले शाळेत जाऊ शकली नाहीत. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर 4 लाख 99 हजार 655 पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली आहे.