पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
नियोजनाअभावी कामाचा बोजवारा
चिंचवड – महापालिका विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, नियोजन नसल्याने येथील कामाचा बोजवारा उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. पिंपरी चिंचवड महापालिकेने काळेवाडी पूल ते चितराव गणपती मंदिर या दरम्यान पदपथाचे सुशोभीकरण केले आहे. पदपथावर वाहने पार्क करू नये, याची खबरदारीही महापालिकेने घेतली असून, त्यासाठी अडथळेही उभारले आहेत. मात्र, येथील पदपथावर ड्रेनेजलाइनमधून मोठी केबल पदपथावर पडली आहे. या केबलच्या बाजूला झाडाचा पालापाचोळा आणि इतर कचरा जमा झाला आहे. महापालिकेकडून या भागात नियमित साफसफाई होत नसल्याने कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. महापालिकेने येथील पदपथ करताना केबलचेही नियोजन व्यवस्थित न केल्याने केबल उघड्यावर पडली असून, त्यामुळे विकासकामांचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.
भुजबळ चौकात रस्ता ओलांडण्यास नागरिकांना करावी लागतेयं कसरत
पिंपरी -मुंबई-पुणे महामार्गावरील भुजबळ चौकातील पादचारी नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. येथील रस्त्यावरून वेगाने वाहने धावतात. येथून नागरिकांनी रस्ता ओलांडू नये याकरिता काही दिवसांपूर्वी दुभाजक निर्माण करण्यात आला आहे. मात्र, काहीच पर्यायी व्यवस्था नसल्याने येथून नागरिकांना जावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरी येथे रस्ता ओलांडण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.
– एस. एन. कुंभार
काळेवाडी येथील भुयारी मार्गामध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त
काळेवाडी -येथील धर्माधिकारी भुयारी मार्गामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत महापलिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची स्वच्छता केली जात नसल्याने येथील भुयारी मार्गात प्लॅस्टिकच्या पिशव्या, रद्दी व अन्य कचरा मोठ्या प्रमाणात साचला आहे. याचा त्रास येथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची दखल घेऊन गांभीर्यपूर्वक विचार करावा व येथील स्वच्छता करावी, अशी मागणी केली जात आहे.