पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
आळंदी येथील इंद्रायणी घाट बनतोय धोबीघाट
आळंदी देवाची येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरालगत असलेल्या इंद्रायणी नदीच्या घाटावर परिसरातील नागरिकांकडून सर्रास कपडे धुतले जात आहेत. हे पवित्र व प्रार्थनेचे ठिकाण असल्याने राज्यातील विविध भागातील भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात. भाविक दर्शनासाठी आल्यानंतर पवित्र इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करण्यासाठी येतात. मात्र, येथे कपडे धुऊन घाटावरील पाणी अस्वच्छकेले जात असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. तरी संबंधित प्रशासकीय विभागाने लक्ष घालून येथील हा प्रकार थांबवावा. अशी मागणी केली आहे.
– निवास दराडे, आळंदी देवाची
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे “अपघाताचा धोका’
पिंपळे सौदागर येथील काटे पाटील चौकात वर्दळीच्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी काही कामानिमित्ताने खोदकाम करण्यात आले होते. मात्र, काम मार्गी लावल्यानंतर येथील रस्ता पूर्ववत न होता खराब झाला आहे. यामुळे रस्त्यावर मोठी खड्डे पडले आहेत. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे रस्त्यावर वाहन चालविणे मोठे त्रासदायक झाले आहे. रात्री खोदून ठेवलेला भाग दिसत नसल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटते, यामुळे येथे दररोज अपघात होत आहेत. तरी येथील रस्त्याची देखभाल दुरुस्ती महापालिकेच्या संबधित विभागाने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.