पुणे – ईशान्येकडील राज्यांची आणि चार शहरांची नावे माहिती करून घेण्याची तसदीदेखील आपण घेत नाही. चेहरेपट्टी वेगळी असल्याने आपण त्यांना नेपाळी किंवा जपानी समजतो. त्यामुळे “माझ्या देशातच मला परके मानतात’ अशी वेदनेची भावना त्यांच्यात निर्माण होते. हे सर्व टाळण्यासाठी ईशान्येकडील राज्यांमधून आलेल्या नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी मैत्री करा, त्यांची विचारपूस करा, त्यांची भाषा शिकून घ्या. त्यामुळे देश अधिक लवकर जोडला जाईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी येथे केले.
महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष डॉ. माधव भट आणि अभय क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, साहाय्यक सचिव सुधीर गाडे यावेळी उपस्थित होते.
सुधीर गाडे यांनी परिचय करून दिला. डॉ. रवींद्र शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. व्हनकटे यांनी आभार मानले.