संस्कृतच्या शिक्षणासाठी भारतीयांनी परदेशी का जावे? राष्ट्रपतींचा रास्त सवाल
त्रिपुरी, ता. 12 – संस्कृतचे शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी जावयास का लागावे हे मी समजूच शकत नाही. आपल्या देशातही भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासासाठी एखादी संस्था निघण्याची आवश्यकता आहे, असे विचार राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी येथे बोलताना व्यक्त केली.
बड्यांच्या वाटाघाटी नेहमीच यशस्वी होतात असे नाही – पं. नेहरू
अमृतसर – बड्या चौघांच्या वाटाघाटीतून नेहमीच सुमधूर फलनिष्पत्ती होईल असे काही नाही, असे उद्गार पं. नेहरूंनी येथे बोलताना काढले.
ते म्हणाले की, सध्या जगाला भेडसावित असलेले प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचे आहेत आणि बडी राष्ट्रे छोट्या राष्ट्रांवर दाब आणत आहेत, तेव्हा अशा परिस्थितीत बड्या राष्ट्रांचे प्रतिनिधी एकत्र बसले तरच एखादा प्रश्न सोडविण्याचा एखादा मार्ग सापडण्याची शक्यता आहे. या पद्धतीनेच इंडोचायनाचा प्रश्न सोडविला जात आहे आणि इतर प्रश्नही हळूहळू याच मार्गाने सोडविले जातील. शांततामय वाटाघाटीचा मार्ग हा दीर्घसूत्री असला तरी दुष्कर प्रश्न सोडविण्याचा तोच एकमेव मार्ग आहे असा विश्वास पंडितजींनी व्यक्त केला.
टेलिफोन्स दुप्पट होणार
नवी दिल्ली – सध्या भारतात अडीच लाख टेलिफोन्स आहेत. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात आणखी तितक्याच टेलिफोन्सची भर पडेल, असे दळणवळणमंत्री श्री. जगजीवनराम यांनी जाहीर केले.
उस्मानिया विद्यापीठास स्वायत्तता मिळणार
हैदराबाद – हैदराबाद विधानसभेत येत्या अंदाजपत्रकी अधिवेशनात एक विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकानुसार उस्मानिया विद्यापीठास शक्य तेवढी स्वायत्तता देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे समजते.