नवी दिल्ली, दि. 30 – निवडणुका फार काळापर्यंत लांबणीवर टाकू नयेत, असे आपले मत असल्याचे आज पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले. निवडणुका फार काळ लांबणीवर टाकल्या तर लोकांचे त्यातील स्वारस्य नष्ट होण्याचा संभव आहे.
सरहद्द प्रांतात उठाव
पेशावर – पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील पर्वतमय भागात उठाव होऊन तेथे 250 ते 300 लोक ठार झाले असे समजते. हा उठाव गेल्या महिन्यात सुरू झाला आहे. सरकारने इमारती लाकडासाठी काही जंगले ताब्यात घेतली. हे यास निमित्त झाले. सरकारने तेथे लढाऊ विमाने, रणगाडे व सैन्य पाठविल्याचे समजते.
नसबंदी मोहीम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करा
पुणे – “आहे तशाच पद्धतीने पुणे कॉंग्रेसने नसबंदी मोहीम पुढेही मोठ्या प्रमाणावर यशस्वी करावी आणि कमी बोलणे, जास्त काम, असे तत्त्व बाळगल्यास या कामाला निश्चितच गती येईल, असे मत संजय गांधी यांनी आज येथे व्यक्त केले. यावेळी संजय गांधी यांनी नसबंदी प्रचार मोहिमेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जगात भारतीय रेस्टॉरंट
नवी दिल्ली – भारतीय पर्यटन विकास महामंडळ जगातील प्रमुख राजधान्यांत भारतीय रेस्टॉरंट्सची एक साखळी सुरू करणार आहे. परदेशात भारतीय खाद्यपदार्थ लोकप्रिय करणे आणि भारत भेटीसाठी परदेशियांना आकृष्ट करणे हा यामागचा उद्देश्य आहे.