नगर -महावितरण कंपनीने जिल्ह्याच्या दक्षिण भागात सक्तीने कृषी पंपाचे वीज बिल वसुली सुरू केली. त्यासाठी कृषीपंपाची वीज बंद करण्याचे पठाणी धोरण महाविकास आघाडी सरकारने घेतले. याविरोधात भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार होते. त्या आशयाचे निवेदन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व आमदार बबनराव पाचपुते यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता काकडे यांना दिले. शेतकऱ्यांचा रोष व भाजपची आक्रमक भूमिका यामुळे महावितरणला वसुली थांबवणे व वीजजोड पूर्ववत करणे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी कर्डिले व पाचपुते यांच्याशी संपर्क करून वीजजोड तातडीने पूर्ववत करून वसुली थांबवण्याचे आश्वासन दिल्याने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.
भाजपचा आंदोलनाचा धसका घेऊन सरकारने तातडीने कारवाई थांबवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. यापुढील काळातही शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही कायम सरकारशी दोन हात करायला तयार आहोत. शेतकऱ्यांनी संघटितपणे सर्व अडचणींचा सामना करावा भाजप सदैव शेतकऱ्यांशी बांधील आहे. पुढील तीन महिने महावितरण कारवाई करणार नाही, वसुली देखील थांबवली असून वीज कनेक्शन देखील कट करणार नाही व पूर्ण दाबाने वीज पुरवठा केला जाईल, अशी माहिती कर्डिले यांनी दिली. उद्या होणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले.
यावेळी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, माजी सभापती हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग, सुरेश सुंबे, जालिंदर कदम, अनिल लांडगे, विश्वनाथ गुंड, संतोष म्हस्के, रेवन चोभे, मनोज कोकाटे, रभाजी सूळ, अंबादास बेरड, सचिन मेहेत्रे, बाळासाहेब अकोलकर, राहुल अकोलकर, बाबासाहेब काळे, सुभाष निमसे, नवनाथ आरोळे, शरद मुळे, वैभव खलाटे, विलास शिंदे, संभाजी साबळे, संतोष पालवे, बंडू पाठक, सुजय काळे, मच्छिंद्र गावडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.