यवतमाळ – माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान भाजपवर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपचे नेते अमित शाह यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. अमित शहांनी शब्द पाळला असता तर भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे सत्तेत असते. मात्र, शहांनी शब्द फिरवला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यावर आता भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. अमित शाह भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर नरेंद्र मोदी आणि अमित भाई यांच्या सभेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं, तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही. युती करताना तुम्ही देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलं आणि निवडणुकीनंतर शरद पवारांनी हात पुढे केल्यावर भाजपसोबत गद्दारी केली. मतदान युती म्हणून मागितलं आणि सत्ता मात्र काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केली. ”
पुढे त्यांनी लिहिले की, “अर्थात गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले. सोबत लहान मुलाला मंत्री केलं आणि माझं कुटुंब, माझी जबाबदारी म्हणत सच्चा शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं. त्याचवेळी तुमचा खोटारडेपणा महाराष्ट्रानं बघितला. आता ही जनता तुमच्या खोट्या शपथा आणि थापांना बळी पडणार नाही.”
खोटं बोल पण रेटून बोल हा @uddhavthackeray यांचा स्वभाव आहे. @AmitShah भाईंसोबत अडीच वर्षाची बोलणी झाली होती तर @narendramodi जी, अमित भाई यांच्या प्रत्येक सभेत @Dev_Fadnavis जी मुख्यमंत्री होणार हे सांगितलं जात होतं. तेव्हा तुम्ही तोंडातून चकार शब्द काढला नाही.
युती करताना…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 9, 2023
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो, शिवसेना आणि भाजप यांच्यात अडीच – अडीच वर्षे मुख्यमंत्री पद ठरले होते. भाजपने जर ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेतले असते. तर आज भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याची आणि बाहेरून आलेल्यांची सरबराई करावी लागली नसती. सुरुवातीला किंवा शेवटी भाजपचे अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद होऊन गेले असते. आता दोन्ही पक्ष सत्तेत असते. पण, ते ठरल्याप्रमाणे वागले नाहीत. आता अखंड पाच वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळालेच नाही. शिवसेना-भाजप युतीतून मी बाहेर पडलो नाही. तर, मला युतीतून बाहेर ढकलण्यात आले,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.