नवी दिल्ली :- दुलीप करंडक उपांत्य फेरीत उत्तर विभाग संघाने दक्षिण विभाग संघावर 2 गडी राखून विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात वादग्रस्त अशीच एक घटना घडल्याने क्रिकेटच्या खेळभावनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोच्या स्टंपिंगच्या वादामुळे जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती आणि खेळाडूंच्या प्रतिष्ठेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता भारताच्या देशांतर्गत स्पर्धेत दुलीप ट्रॉफीमध्ये खेळाडूंबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
घडले असे की, सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण विभागाच्या संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी 219 धावांची गरज होती. सामना अनिर्णित राहिला असता तर उत्तर विभागाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असता. वास्तविक, पहिल्या डावाच्या जोरावर उत्तर विभागाने तीन धावांची आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत नियमानुसार सामना अनिर्णित राहिला असता, तर पहिल्या डावात आघाडी मिळविणाऱ्या संघाला विजेता घोषित केले गेले असते आणि त्यानंतर उत्तर विभागाचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता.
अशा स्थितीत ही संधी साधून सामना जिंकण्याच्या प्रयत्नात उत्तर विभागाच्या संघाने अशी खेळी केली, ज्यावर आता टीका होत आहे. याची जाणीव असलेल्या उत्तर विभागाच्या संघाने डावपेच आखत मैदानावर वेळ वाया घालवण्याच्या युक्त्या खेळण्यास सुरुवात केली.
त्यामुळे उत्तर विभागाच्या संघाने शेवटच्या 5.5 षटकांसाठी 53 मिनिटांचा वेळ घेतला. पण उत्तर विभागाच्या या रणनीतीवर साई किशनने पाणी फिरवले. साई किशनने शानदार फलंदाजी करत संघाला शेवटच्या सामन्यात 2 गडी राखून विजय मिळवून दिला.
या सामन्यानंतर उत्तर विभागाच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित झाले आहे.
खरं तर, भारताचा माजी खेळाडू दोड्डा गणेशने त्याच्या ट्विटर खात्यावर उत्तर विभागाच्या “क्रीडाविरोधी” वर्तनावर टीका केली आणि भविष्यात अशा प्रकारचे डावपेच अवलंबले जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली आहे.