कान्हे, (वार्ताहर) – मातीची भांडी बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार बांधवांना लिदच्या टंचाईमुळे व्यवसाय करण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे ग्रामीण भागात या व्यवसायात आता थोडीच कुटुंबे टिकून आहेत.
एका विशिष्ट ठिकाणावरून कुंभार बांधव साहित्य बनवण्यासाठी माती आणतात. ती माती आणल्यावर बारीक करून त्यामध्ये पाणी टाकून ते मुरत ठेवतात. दोन दिवसांनंतर मुरलेल्या मातीमध्ये घोड्याची लिद मिसळतात. मग मशीन चक्राच्या साह्याने त्यावर मातीची विविध भांडी तयार करतात.
या व्यवसायात साहित्य तयार करण्यासाठी घोड्याची लीद अत्यंत आवश्यकता असते. त्याशिवाय भांडे हे पक्के तयार होऊ शकत नाही. आधी ग्रामीण भागात घोड्यांची संख्या अधिक होती. त्यावेळी लीद सहजतेने उपलब्ध व्हायची. परंतु कालांतराने हळूहळू घोड्यांची संख्या कमी झाल्याने आता घोड्यांच्या तबेल्यातून तीनशे रुपये कट्ट्यानुसार लीद आणावी लागते.
लीद आल्यानंतर तिला उन्हात वाळवून ठेवावी लागते. नंतर ती सुकल्यावर सुपाने पाखडून राहिलेला बारीक माल हा मुरूत ठेवलेल्या मातीमध्ये मिसळावा लागतो. एकदा यापासून साहित्य तयार झाले की ते टायर किंवा तुराटीच्या इंधनाने भाजावे लागते.
या सर्व प्रक्रियेत सरासरी ३० लिटरचा एक माठ तयार करण्यासाठी साधारणतः १२५ रुपयांपर्यंतचा खर्च होतो. तर १६५ ते १७५ रुपयापर्यंत वर्षभर विविध व ऋतूप्रमाणे आवश्यक असलेले हे साहित्य तयार करताना आता कुंभार बांधवांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. या सर्व बार्बीना कंटाळून ग्रामीण भागात असलेल्या कुंभार समाजापैकी अनेक समाजबांधवांनी इतर दुसरी कामे करण्यास सुरुवात केलेली आहे.
सध्या ग्रामीण भागातही घरोघरी फ्रीज आले आहेत. त्यामुळे माठांच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र अजूनही काहीजण आरोग्यासाठी फ्रीज पेक्षा माठातील पाणी पिण्याला प्राधान्य देत आहेत.
काळ्या माठाला मागणी अधिक
काळ्या माठाप्रमाणे लाल माठसुद्धा पाणी थंड करते. तुराटीवर भाजल्यामुळे त्याला लाल रंग येतो व टायरमध्ये भाजले तर माठाला काळा रंग येतो. बस एवढाच फरक असताना देखील ग्राहक मात्र काळ्या माठाकडेच जास्त आकर्षित होतात, असे कुंभार व्यावसायिकांचे म्हणने आहे.