पुणे(दि. 14 आॅक्टोबर) :- मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथल्या रस्त्यांप्रमाणे पुणे जिल्ह्यातही खड्डेमय रस्त्यांची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी ठिकठिकाणी अभिनव पद्धतीने आंदोलनं करून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पुणे- सातारा महामार्गावरील खड्डे तसंच खचलेला रस्ता आणि अर्धवट कामाच्या निषेधार्थ पक्षाच्या रस्ते- आस्थापना विभागाने आज रस्त्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. माई मंगेशकर हॉस्पिटल पूल ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यालय या मार्गावर ही अंत्ययात्रा काढण्यात आली.
त्यानंतर पक्षाच्या रस्ते, साधन- सुविधा आणि आस्थापना विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष जगदीश वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ‘एनएचएआय’चे मुख्य प्रबंधक सुहास चिटणीस यांना मागण्यांचे निवेदन दिले.
“पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर लाखो वाहने धावतात. हा महामार्ग सहा पदरी करण्याचे ठरले. पण चार पदरी असलेल्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघात झाले आहेत. या रस्त्यावर महिलांसाठी कुठेही स्वच्छतागृह नाही. वारंवार तक्रार करुनही रस्ते महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई केली नाही.
आता जर तातडीने पावले उचलली नाही, तर आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल” असा इशारा जगदीश वाल्हेकर यांनी यावेळी दिला. मनसेच्या या इशाऱ्यानंतर ‘रिलायन्स इन्फ्रा’चे राकेश कोळी यांनी “पुढील 15 ते 30 दिवसांत सर्व खड्डे भरले जातील” असे आश्वासन दिले.