मुंबई – लातूरच्या उदगीर नगरपंचायतीतील एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पाच नगरेसवकांसह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने उदगीरमध्ये एमआयएमला मोठा धक्का बसला आहे.
एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी एमआयएमला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रेवश केलेल्या सर्व नगरसेवकांचे स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील आदी उपस्थित होते.
@NCPspeaks प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil, उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यमंत्री ना. @BansodeSpeaks यांच्या पुढाकाराने एमआयएम पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सय्यद ताहेर हुसेन व लातूर नगरपंचायतीमधील अनेक नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला. pic.twitter.com/xmi3aeLxdU
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 14, 2021
भाजप सत्तेत टिकण्यासाठी एमआयएमचा दुरुपयोग करत आहे. भाजपाचे हितसंबंध जपण्यासाठी एमआयएमला उभं करुन अल्पसंख्यांक समाजाची मते विभागून भाजपचा विजय होण्यासाठी मदत होत आहे. ही चूक पुन्हा होणार नाही म्हणून एमआयएममधील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत येत आहेत. अल्पसंख्यांक समाजाने पाठिंबा दिला तर ही ताकद आणखी वाढायला मदत होईल, असे सांगतानाच आपल्या हितसंबंधांना बाधा पोचणार नाही. नगरपरिषदेत आपल्या हिताचे संरक्षण होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे त्याला जातीयवादाने नव्हे तर धर्मनिरपेक्षवादाने उत्तर देवू शकतो, असेही पाटील म्हणाले.