पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळाच्या कार्यालयात 266 कनिष्ठ लिपिकांची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान राज्यात करोनाचे संकट असल्याने नवीन पद भरतीमुळे वेतनावरील खर्चाचा भार वाढेल असे म्हणत शासनाने या भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठविण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे आता भरती प्रक्रिया रखडणार हे निश्चित झाले आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या मंडळाच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिकांच्या भरतीसाठी 10 सप्टेंबर 2019 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अटी व शर्तीच्या अधिन राहून उमेदवारांनी महापरीक्षा पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती.
या उमेदवारांची डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पोर्टलवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल 3 जानेवारी 2020 रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला होता. सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार व रिक्त पदांच्या प्रमाणात तयार करावयाच्या निवड यादीच्या आवश्यकतेनुसार 1 हजार 67 उमेदवारांना मूळ कागदपत्रे छाननीसाठी मंडळाकडून निमंत्रित करण्यात आले होते.
या छाननीनंतर मंडळाच्या सक्षम समितीच्या मंजुरीनुसार निवड यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यापूर्वीच करोनामुळे राज्यात 23 मार्च पासून लॉकडाऊन, संचारबंदी करण्यात आली होती. अखेर निवडयादी जाहीरच करण्यात आली नाही. दरम्यान, राज्य शासनाच्या वित्त विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये, असे आदेश 4 मे रोजी काढले.
हे आदेश अद्यापही कायमच ठेवण्यात आलेले आहेत. राज्य मंडळाकडे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेबाबत वारंवार विचारणा केली जात होती. त्यावर भरती प्रक्रिया नव्याने सुरू करावयाची नसून निवड यादीच्या आधारे पात्र उमेदवारांना पुढील प्रक्रिया पूर्ण करुन नियुक्त्या देण्यासाठी मान्यता मिळावी असा प्रस्ताव 12 जून व 18 ऑगस्ट रोजी राज्य मंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.