महापालिकेच्या दुर्लक्षातून येरवड्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेची पडझड
येरवडा – येरवडा भागात पुणे महापालिकेची सर्वांत मोठी असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेला अवकळा आली आहे. “आशिया खंडामध्ये सर्वांत मोठी शाळा’, असा लौकिक मिरवणाऱ्या या शाळेचा हा लौकिक जपण्यासाठी महानगरपालिकेने लक्ष द्यावे, दुरूस्तीसाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी करीत निधी देणे जमत नसेल तर… माजी विद्यार्थी याकामी पुढाकार घेतील, असे उच्चपदस्थ असलेल्या या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी पालिका प्रशासनास ठणकावले आहे.
येरवडा येथील महानगरपालिकेच्या शाळेत 1980-85 म ध्ये वाघोली, लोहगाव, चऱ्होली, म्हस्केवस्ती, कळस, धानोरी या परिसरातील गरीबा घरची मुले शिक्षण घेण्यासाठी येत होती. संपूर्ण शाळेची पट संख्या 5,500 होती. तसेच, कडक शिस्तिचे शिक्षण दिले जात असल्याने या शाळेतील विद्यार्थी विविध विषयांत, खेळांत चकमत होते.
परीक्षा कोणतीही असी तरी या शाळेचे उत्तीर्णांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे आशिया खंडामधील सर्वांत मोठी शाळा, असा उल्लेख या शाळेचा केला जात होता. येथील अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आज सरकारी, निमसरकारी, खासगी तसेच विविध विभाग, क्षेत्रात मोठमोठ्या हुद्यांवर काम करीत आहेत. पुणे शहराबाहेर कार्यरत असलेले हे विद्यार्थी इकडे आले की या शाळेला आवर्जून भेट देतात. परंतु, सध्याची शाळेची अवस्था पाहून या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षातून कालओघात आता 5,500 विद्यार्थी पट संख्या आता एक हजार विद्यार्थ्यांवर आला आहे. एकेकाळी भव्य आणि सुंदर असलेल्या या शाळेच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे. रंग उडालेल्या भिंती, परिसरात अस्वच्छता, सीमाभिंतीला पडलेले भगदाड, शाळा परिसरात वावरणारे मद्यपी, व्यसनी नागरिक, शाळा परिसरात इतरत्र पडलेल्या दारुच्या बाटल्या, पूर्णपणे मोडकळीस आलेले स्वच्छतागृह ही अवस्था पाहून माजी विद्यार्थी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
शाळेची झालेली अवस्था पाहून हिच का आमची शाळा? असा प्रश्न या माजी विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. याच प्रश्नांतून अस्वस्थ झालेले माजी विद्यार्थी 32 वर्षांनी एकत्र आले. शाळेची अवस्था पाहून त्यांनी याबाबत पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना बोलावून घेत, त्यांच्याशी चर्चा केली. शाळा आवारात येणाऱ्यांवर कारवाई तसेंच सातत्याने पोलिसांची गस्त ठेवण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक शेख यांनी दिले. तर, शाळा दुरस्तीसाठी माजी विद्यार्थी महानगरपलिकेशी संपर्क साधत आहेत.
शाळेच्या आसपासचा परीसर तसेच शाळा देखभाल, दुरुस्तीसाठी क्षेत्रीय कार्यालयाकडे अनेकदा अर्ज, निवेदन दिली आहेत. शाळेची सीमाभिंती अज्ञातांनी तोडली आहे, याबाबतही तक्रार केली आहे. याच ठिकाणी कचराकुंडी करण्यात आली आहे. त्यातून दुर्गंधी सुटते. याबाबतही अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देत नाही.
– वीणा ढगे, मुख्याध्यापिका