महापालिकेकडून जैवविविधता धोरण आणि कृती योजनेचे काम
पिंपरी – वाढत्या नागरीकरणात शहरातील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. ही बाब लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिकेने जैवविविधतेच्या संवर्धनासाठी काही प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पातंर्गत शहरातील जैवविविधता निर्देशांक काढणे, नागरिक जैवविविधता नोंदवही तयार करणे आणि स्थानिक जैवविविधता धोरण आणि कृती योजना तयार करण्याचे काम हाती घेतले आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अभिप्रायाद्वारे दिली आहे.
शहरातील पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित राहावा, नद्या प्रदूषित होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी 14 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कपात सूचनेद्वारे केली होती. त्याबाबत शासनातर्फे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आठ महिन्यानंतर अभिप्राय दिला आहे.
हिवाळ्यात शहरामध्ये युरोप, रशिया, मंगोलिया, सायबेरिया, अफगाणिस्तान येथून पक्ष्यांचे थवे येतात. मुळा, इंद्रायणी आणि पवना नद्यांच्या परिसरात तसेच सुमंत सरोवर, संभाजीनगर, चिखली भागातील खाणींच्या परिसरात शहरातील विविध प्रकारचे पक्षी उतरतात. विदेशातून येणाऱ्या पक्ष्यांमुळे परिसरातील निसर्गसौंदर्यात वाढ होते.
शहरातील विविध उद्यानांमुळे हरित शहर म्हणून नवीन ओळख मिळालेल्या पिंपरी-चिंचवडचे स्मार्ट सिटीमध्ये रूपांतर होत असताना नैसर्गिक नदी-नाले, पाणवठे आणि त्यांचा परिसर नैसर्गिकरित्या अबाधित ठेवणे गरजेचे आहे. त्यामध्ये कृत्रिम बदल न करण्याबाबत तातडीची उपाययोजना करण्यात याव्या. शहरामध्ये 15 वर्षांपूर्वी दिसणारे पक्षी सध्या कमी झालेले आहेत. पक्ष्यांचा अधिवास जतन करण्याची गरज आहे. त्यासाठी पक्ष्यांचे वैभव जपण्याचे काम करणाऱ्या विविध संस्था, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी भूमिका आमदार जगताप यांनी मांडली आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शासनामार्फत दिलेल्या अभिप्रायात म्हटले आहे की, शहरात स्थलांतर करून येणारे आणि स्थानिक पक्ष्यांचा नदीकाठचा नैसर्गिक अधिवास जपून विकासकामे करण्यात येत आहेत. तसेच, पक्षी समृद्धीचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
महापालिकेच्या दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालानुसार गेल्या काही वर्षात जैवविविधतेचा आकडा खालावलेला नसल्याचे स्पष्ट होते. त्याशिवाय, पर्यावरण संवर्धन, नागरिक आणि लहान मुलांच्या मनोरंजनासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची उद्याने विकसित केलेली आहेत. तसेच, नव्याने उद्याने विकसित करण्याचे नियोजन केलेले आहे.
शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीमधील प्रदूषण कमी करण्यासाठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प प्रस्तावित आहे. पवना व इंद्रायणी नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी गोळा करून नजीकच्या मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. त्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूने इंटरसेप्टर सिव्हर लाइन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. जेणेकरून घरगुती तसेच औद्योगिक सांडपाणी नदीपात्रात मिसळणार नाही. तसेच, नदी पुनरूज्जीवन प्रकल्पातंर्गत नदीचे नैसर्गिक पद्धतीने संवर्धन करण्याबाबतचा प्रकल्प अहवाल शासनाकडे विचाराधीन आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.