अनिल देशपांडे
तालुक्यात हलक्या जमिनीत लागवडीच्या क्षेत्रात होतेय वाढ
राहुरी – राहुरी तालुक्यात जिरायती, हलक्या कोरडवाहू शेतीत डाळिंबाने आर्थिक क्रांती केली आहे. तालुक्यात सर्वाधिक 720 हेक्टर क्षेत्र डाळिंबाखाली आले आहे.
तालुक्याच्या कोरडवाहू दुष्काळी भागातील हलक्या मुरमाड जमिनीची उत्पादकता खूपच कमी होती. भूसार पिके आणि मिळेल, तेवढे उत्पन्न अशी स्थिती या शेतजमिनीची होती. मात्र पाण्याची थोडी शाश्वतता आल्याने तालुक्यातील या हलक्या जमिनी डाळिंबाची लागवडीखाली आल्या आहेत. आता हेक्टरी किमान अडीच लाख रुपयांपेक्षाही जास्त उत्पन्न देणाऱ्या या डाळिंबाने दुष्काळी भागाचे अर्थकारणच बदलविले आहे.
तालुक्यातील कोरडवाहू, हलक्या, जिरायती शेतजमीनीत बाजरी, तूर, मूग अशी भूसार पिकेच घेतली जात होती. तिचे उत्पन्न आणि उत्पादकता हा काही विषयच नव्हता. मात्र थोडी पाण्याची शाश्वतता आली आणि जिरायती शेतीचे चित्र आश्चर्यकारकरित्या बदलले आहे. विकसित झाले आहे. कोरडवाहू फळात बोर, चिंच, अंजीर, सिताफळ, डाळिंब आणि आवळ्याचा समावेश असला तरी सर्वाधिक पसंती डाळिंबास मिळाली आहे.
कृषी मंडलनिहाय डाळिंबाखालील क्षेत्र हेक्टरमध्ये याप्रमाणे असल्याची माहिती कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी दिली. वांबोरी – 100, ब्राहमणी- 50, ताहाराबाद- 300, राहुरी- 70, सात्रळ – 150, देवळालीप्रवरा- 40, टाकळिमया- 25. यापैकी शंभर टक्के क्षेत्र ठिबकखाली आले आहे. अर्थशास्त्रात हेक्टरी पहिल्या वर्षाचा खर्च अडीच लाख, नंतर दिड लाख रुपये प्रतिवर्षी, तिसरे वर्षापासून उत्पादनास प्रारंभ, दहा ते बारा वर्षे उत्पादन देते. किमान उत्पादनात हेक्टरीः दहा टन, भाव सरासरी, पन्नास हजार रुपये. हेक्टरी सरासरी उत्पन्नामध्ये अडीच लाख. धोकेत तेल्यामुळे डाळिंबाच्या बागा उध्दवस्त झाल्या.
तीन वर्षांपासून डाळिंब घेत आहे. एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते. भाव चाळीस ते साठ रुपये प्रतिकिलो मिळाला. एकरी खर्च दीड लाख रुपये येतो. पडिक जमीन आता लाखाभराचे एकरी उत्पन्न देत आहे. शेततळे, ठिबक संचामुळे कमीत कमी पाण्यात जिरायती शेती बागायती झाली आहे. डाळिंबाने जिरायती शेतीत आर्थिक क्रांती केली आहे.
मच्छिंद्र शेटे, शेतकरी चिंचविहीरे
सन 2005 पासून डाळिंब घेऊ लागलो. आधी फक्त भूसार पिके घेत होतो. तीस गुंठ्यापासून डाळिंब सुरु केले. आज तीस एकर क्षेत्र डाळिंबाखाली आहे. सहा एकरात 72 टन डाळिंब मिळाले. भाव प्रतिटन 62 हजार रुपये मिळाला. एकरी खर्च दीड लाख रुपये, डाळिंबाची विक्री सोलापूर, मुंबई, पंढरपूर येथे केली. दीड व दोन कोटी लिटर पाण्याचे शेततळे आहे. पूर्ण बाग ठिबकसंचावर आहे. जेथे कुसळही उगवत नव्हते. तेथे आज वर्षाकाठी लाख रुपये मिळत आहेत. हलकी जमीन देखील लाख मोलाचे उत्पन्न देऊ लागली आहे. उत्पन्नात शाश्वतता आली आहे.
बाबासाहेब धाडगे, शेतकरी कणगर