लोणी देवकर – शेतकऱ्यांना हमखास पैसे मिळवून देणाऱ्या फळपीक म्हणजेच डाळिंबाला सध्या चांगला दर मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी समाधानी आहे. इंदापूर तालुक्यात प्रामुख्याने डाळिंबाच्या गणेश व भगवा या प्रजाती आहेत. साधारण प्रतीची जमीन आणि कमी पाण्यावर या फळाचे पीक घेता येत असल्याने आणि बरामहिनेही याला इतर फळपिकांच्या तुलनेत चांगला बाजारभाव असल्याने मध्यंतरी इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाने याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती.
मात्र त्यावर पडणारे विविध रोग, त्याचा मशागतीचा खर्च यामुळे अनेकांनी आपल्या डाळिंब बागा काढून टाकल्या आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील डाळिंब क्षेत्र कमालीचे घटले आहे. तसेच इतर ठिकाणी देखील शेतकरी इतर फळ पिकांकडे वळत असल्याने बाजारात डाळिंब पिकाची कमतरता भासत आहे. यामुळेच सध्या बाजारात डाळिंब कमालीचे भाव खात असल्याचे दिसत आहे.
यामध्ये दुय्यम दर्जाचे डाळिंब सरासरी 50 ते 100 रुपये आणि प्रथम दर्जाचे साधारणतः 300 ते 400 ग्रॅम वजनाचे डाळिंब 150 ते 200 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डाळिंब पीक वाचविण्यासाठी काही शेतकऱ्यांनी एन उन्हाळ्यात टॅंकरने पाणी आणून आपल्या बागा वाचविल्या आहेत.
तसेच त्यावर पडणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागडी औषधे, त्याची देखभाल आणि केलेले कष्ट आणि त्या तुलनेत बाजार भाव मिळत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. इंदापूर येथील बाजार समितीमध्ये देखील डाळिंबाची आवक कमी असल्याने डाळिंबाचे दर तेजीत असल्याचे येथील आडतदार सांगत आहेत.
बागा काढल्याने आवक घटली
मध्यंतरी डाळिंबाचे कोसळले दर, मशागतीचा खर्च आदींमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागा काढून इतर फळ बागा करण्याकडे वळला आहे त्यामुळे बाजारातील डाळिंबाची आवक कमालीची घटली असल्याने सध्या डाळिंब तेजीत आहे.