मुंबई – हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारी रोजी जयंती असून या निमित्ताने विधान भवनातील सेंट्रल हॉल येथे बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. मात्र, या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव ‘उद्धव ठाकरे’ यांचं नाव नसल्याने ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावेळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या सूड आणि बदला घेण्याचं राजकारण सुरू आहे. विधान भवनातील कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण देण्यात आले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यामागे एक राजकारण आहे. राज्यात बाप चोरणारी टोळी सक्रिय झालीय हे पुन्हा एकदा सिद्ध झाले’. असं ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, “जेव्हा आम्ही सावरकरांचं तैलचित्र लावले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव छापले होते. ही परंपरा आहे… शिष्टाचार आहे. पण, बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावत असताना त्यांच्या चिरंजीवांना निमंत्रण न देणे हे सुडाचे राजकारण आहे”. असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
‘आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच पंतप्रधान उद्या मुंबईत येत आहेत…’
‘उद्या देशाचे पंतप्रधान ज्या कामांचं लोकार्पण करण्यासाठी येणार आहेत, त्यातील बरीचशी कामे शिवसेनेने सुरू केली होती. शिवसेनेने केलेल्या कामाच्या पायभरणीचं लोकापर्ण होणार आहे. याचा अर्थ आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत येत आहेत’. असं देखील राऊत यावेळी म्हणाले.