पुणे -भारताला जी-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळणे ही गौरवाचीच बाब आहे. मात्र केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजप या परिषदेचे राजकारण करत आहे. परिषदेच्या पुण्यात बैठका होत असून त्यासाठी पुण्याचे खासदार, आमदारांना निमंत्रणसुद्धा दिले नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचे स्वत:च्या शहराबद्दल काय मत आहे हे केंद्र सरकारने ऐकून तरी घ्यायला हवे होते. अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी या नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देखमुख उपस्थित होते.
जी-20 च्या कामांची पोलखोल करणार
दरम्यान, जी-20 च्या निमित्ताने भाजपच्या आग्रहाखातर महापालिका आयुक्तांनी शहरात जवळपास 175 कोटींची कामे केली असल्याचा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. गेली पाच वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती. या पाच वर्षात पालिकेचे अंदाजपत्रक तब्बल 40 हजार कोटींचे होते. या कालावधीत भाजपने शहराचा कायापालट केल्याचा दावा केला आहे. मग, या परिषदेसाठी सुशोभिकरणावर एवढा खर्च का करावा लागला असा सवाल शहराध्यक्ष जगताप यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे, जी-20 साठी शहरभर केलेले सुशोभिकरण हे भाजपच्या कामाची पोलखोल करणारे असल्याची टीका जगताप यांनी केली.