तेलंगणातील सत्ताधारी पक्षातील आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा आरोप आहे. मात्र या आरोपात किती तथ्य आहे?
भारतीय जनता पक्षाकडून विरोधी पक्षाची सरकारे पाडण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात असतो. राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, नवी दिल्ली येथे सत्ताधारी पक्षांचे आमदार फोडून, ते आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न भाजपने केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवण्याचा “कार्यक्रम’ भाजपने करून दाखवला. उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यामध्ये मी महत्त्वाची कामगिरी कशी निभावली, याचा उल्लेख मोठ्या गर्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असतात. परंतु यामुळे भाजपचे अद्याप समाधान झालेले नाही. म्हणून शिवसेनेचे आणखी काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार कधी त्या पक्षातून आमच्याकडे येतील, हे संबंधित पक्षाच्या नेत्यांना कळणारदेखील नाही, अशी फुशारकी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मारली आहे.
या पार्श्वभूमीवर, टीआरएस किंवा तेलंगण राष्ट्र समितीच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप झाला आहे. मात्र गेल्या आठवड्यात तेलंगण भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय हे हैदराबादेतील यादाद्री मंदिरात गेले आणि आम्ही टीआरएसचे चार आमदार फोडण्याचा कट रचला नसल्याचे त्यांनी तेथे शपथपूर्वक जाहीर करून टाकले. टीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही मंदिरात येऊन यासंबंधी शपथपूर्वक काय ते सांगून टाकावे, असे आव्हान बंडी यांनी दिले. आमदार फोडण्याप्रकरणात सायबराबाद पोलिसांनी फरीदाबाद येथील एक धर्मगुरू आणि तिरूपती येथील एक साधू व हैदराबादच्या व्यापाऱ्यास अटक केली आहे. “आपलेच आमदार आपल्याला सोडून जाऊ शकतात, मोनुगोडे विधानसभा पोटनिवडणुकीत टीआरएसला फटका बसणार आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहीत असल्यामुळेच त्यांनी भाजपवर चिखलफेक करण्यास सुरुवात केली आहे’, असा आरोप बंडी यांनी केला आहे.
तिकडे, अटकेत असलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची पोलिसांची मागणी भ्रष्टाचारविरोधी ब्युरोच्या न्यायालयाने नाकारली आहे. टीआरएसचे आमदार पायलट रोहित रेड्डी यांनी, आपणास शंभर कोटी रुपये देण्याची ऑफर घेऊन दोन व्यक्ती आल्या होत्या, असा आरोप करून, एफआयआर नोंदवला होता. महाराष्ट्रात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची वसुली केल्याचा आरोप केला होता. सचिन वाझेचेही नाव या प्रकरणात आले आणि ते व देशमुख हे त्यानंतर तुरुंगात गेले. या प्रकरणामुळे महाविकास सरकारचे नाव भाजपने “महावसुली सरकार’ असे ठेवले होते. असो. तेलंगणातील हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे किंवा विशेष पोलीस पथक नेमून त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी तेलंगण भाजपने उच्च न्यायालयात अर्ज करून केली होती. तेलंगण राज्य पोलिसांनी तपास केल्यास, पूर्वग्रहदूषित पद्धतीने चौकशी केली जाईल आणि त्यात भाजप नेत्यांना अडकवले जाईल, अशी भीती त्या पक्षास वाटत आहे. याचा अर्थ, प्रादेशिक पक्षांचा सीबीआय, एनआयए, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांवर विश्वास नाही तर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाची सत्ता ज्या राज्यांत नाही, तेथील पोलिसांवर भाजपचा विश्वास नाही, अशी एकूण स्थिती आहे.
दरम्यान, घोडेबाजार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांकडून पंधरा कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. रेगा कंथा राव, गुव्वाला बलराजू, बिरम हर्षवर्धन रेड्डी आणि पायलट रेड्डी यांना विकत घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती उघड झाली आहे. केवळ पैशाचेच नव्हे, तर पदांचेही आमिष दाखवण्यात आले. याची दुसरी बाजू अशी की, ही घटना घडण्यापूर्वी विधान परिषदेचे माजी अध्यक्ष स्वामी गौर आणि दुसरे नेते श्रावण दासोजू यांनी भाजपचा त्याग करून टीआरएसमध्ये प्रवेश केला. तसेच रापोलु आनंद भास्कर यांनी भाजपला रामराम ठोकून, टीआरएसशी दोस्ती केली. थोडक्यात, तेलंगणात आयाराम-गयाराम संस्कृती ही बोकाळलेली आहे.
डिसेंबर 2023 मध्ये तेलंगणात विधानसभा निवडणुका असून, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपली शक्ती वाढवण्याचा निकराचा प्रयत्न करत आहे. अडीच वर्षांपूर्वी तेलंगणची राजधानी हैदराबाद महापालिका निवडणुकांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणचा दौरा केला आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्यावर तुफान हल्ला चढवला. देशात ठिकठिकाणी घराणेशाहीचे पेव फुटले असून, केसीआर यांचीही घराणेशाही आहे आणि यात परिवर्तन झाले, तरच देश व तेलंगण वाचू शकेल. मात्र सध्या लोकशाही अर्थव्यवस्था ही परिवारवादाने घेरलेली आहे, अशी टीका मोदी यांनी केली. मध्यंतरी तेलंगणात झालेल्या दोन पोटनिवडणुकांत भाजपला विजय मिळाला असून, 2020च्या हैदराबाद महापालिका निवडणुकांत भाजपने उत्तम कामगिरी बजावली होती. टीआरएसचे प्रमुख आणि मुख्यमंत्री केसीआर हे कर्मकांडावर विश्वास ठेवणारे आहेत. तेलंगणचा उद्धार व्हायचा असेल, तर अंधश्रद्धाळू लोक तो करू शकणार नाहीत, अशी टीकाही मोदी यांनी केली होती.
2024च्या लोकसभा निवडणुकांत राष्ट्रीय स्तरावर मोठी भूमिका निभावण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व आपण करावे असे त्यांना कितीही वाटत असले, तरी ते शक्य नाहीये. कारण मुळात तेलंगण हे अत्यंत छोटेसे राज्य आहे. परंतु एकेकाळी आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रीय स्तरावर किंगमेकरची भूमिका वठवल्यामुळे टीआरएस यांना प्रेरणा मिळाली असावी.