जिल्ह्यात 221 ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंच निवड : प्रचार मोहिमेसाठी रणनीती
सोशल मीडियावरही वाढली रणधुमाळी
जिल्हा प्रतिनिधी
पुणे – जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींवर जनतेतून थेट सरपंचाची निवड केली जाणार आहे. 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 20 तारखेला निकाल लागेल. त्यामुळे गुलाबी थंडीत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. सरपंच उमेदवारांसह सदस्य पदांसाठी उमेदवारांची निवड पूर्ण करून प्रचार मोहिमेसाठी रणनीती आखली जात आहे.
ग्रामपंचायतमध्ये प्रशासक राज येणार व त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लांबणीवर जाणार, अशा चर्चांमुळे अनेक गावात उमेदवारांची निवड करण्यास पुढाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते; मात्र आता सर्वांनी उमेदवारांच्या निवडीवर फोकस केले आहे.
उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असलेले निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवार लोकांच्या व पुढाऱ्यांच्या भेटी घेत आहेत. त्यातच पुढाऱ्यांनी सदस्य पदांसाठी उमेदवारांची यादी बनविणे सुरू केले असून येत्या चार-पाच दिवसांत त्याला अंतिम रूप देऊन प्रचार सुरू करण्यात येणार आहे.
221 ग्रामपंचायतींवर होणार थेट सरपंचाची निवड
पूर्वीच्या युती सरकारचा निर्णय बदलत महाविकास आघाडीने सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता; मात्र शिंदे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा थेट जनतेतून सरपंचनिवड होणार आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे तेथे दुसऱ्यांदा जनतेतून सरपंच निवड केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या 221 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे.
दिवाळी अजूनही सुरूच
ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. भावी उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भावी उमेदवारांनी भाऊ रामराम म्हणण्यास सुरुवात झाली आहे. कधी रामराम न घेणारे आता आर्वजून रामराम घेत आहेत. दिवाळी संपली तरी शुभेच्छांचा वर्षाव सुरूच आहे. शासनाने जाहीर केलेल आनंदाचा शिधा काही उमेदवारांकडून मोफत दिला जात आहे.
राजकीय पक्ष लागले कामाला
येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांची ही एकप्रकारे राजकीय तालीमच असणार आहे. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून सज्ज व सतर्क झाले असून सभा व बैठकीचे नियोजन केले आहे.
भूमिपूजन व राजकीय कार्यक्रमांना ब्रेक
निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या तारखेपासून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या सभा, बैठका, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमांना ब्रेक लागला आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने विधि कार्यक्रम, उत्सवांच्या माध्यमातून भावी उमेदवार जनसंपर्क वाढवित असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
भोरमध्ये सर्वाधिक 54 ग्रामपंचायतींच्या निवडणुका
जिल्ह्यात सर्वाधिक 54 ग्रामपंचायतींच्या निवडणूक भोर तालुक्यातील आहेत. तर पुरंदरमधील एकाही ग्रामपंचायतीचा समावेश नाही. यात जुन्नर व वेल्ह्यातील प्रत्येकी दोन नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. वेल्हे -28, भोर -54, दौंड- 8, बारामती- 13, इंदापूर -26, जुन्नर -17, आंबेगाव- 21, खेड -23, शिरूर- 4, मावळ- 9, मुळशी- 11, हवेली -7 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले असून, पुढील महिनाभर ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघणार आहे.
भावी उमेदवार ऍक्टिव्ह मोडवर
ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भावी उमेदवारांनी सर्वप्रथम मतदार याद्या गोळा करून आपल्या वॉर्डात किती मतदार आहेत. यापैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळू शकते याचा अंदाज घेत सरपंच की सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा याची तयारी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांच्या याद्या घेण्यासाठी भावी उमेदवारांची गर्दी दिसून आली.