अमित शिंदे
उंडाळे -जिल्ह्यातील मोठी बाजार समिती म्हणून कराड बाजार समितीकडे पाहिले जाते. याच बाजार समितीची निवडणूक तोंडावर आल्याने या निवडणुकीसाठी तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम दि. 27 मार्च रोजी जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. या निवडणुकीमुळे कराड उत्तरसह दक्षिणेमधील अनेकांना भविष्यातील होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी “विरोधकांचा विरोधक तो आपला मित्र’ हे तत्व वापरून अनेकजण एकी हेच बळ या उक्तीनुसार सत्ताधाऱ्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरु झाले आहेत.
कराड बाजार समितीवर ऍड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांची सत्ता आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमध्ये उदयसिंह पाटील यांच्या पराभवासाठी कराड दक्षिणसह उत्तरेमधील अनेक नेत्यांनी केलेली एकी जगजाहीर आहे. एकट्या उदयसिह पाटील यांच्या पराभवसाठी माजी मंत्री बाळासाहेब पाटील व कराड दक्षिणचे भाजपचे नेते अतुल भोसले यांनी रात्रीचा दिवस केला होता. सध्या तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील व भाजपचे दक्षिणचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यात सख्य निर्माण झाले आहे. भोसले यांच्या मदतीनेच बाळासाहेबांनी जिल्हा बॅंक निवडणुकीत उदयसिंह पाटील यांचा पराभव केला होता. आता बाजार समितीच्या निवडणुकीतही हे दोघे एकत्र लढणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत एकी करूनही उदयसिंह पाटील यांचा पराभव थोडक्या मतांनी झाला होता. त्यामुळे आता उदयसिंह पाटील यांचा बाजार समितीमध्ये पराभव करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कराड दक्षिणसह उत्तरेतील अनेकांनी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. कराड दक्षिणमध्ये गेली 40 वर्ष कै. विलासराव पाटील उंडाळकर (काका) यांनी एकहाती सत्ता राखली.
त्याच सत्तेला खिंडार पाडण्यासाठी व आताच झालेल्या दक्षिणेमधील अनेक सोसायटीच्या निवडणुकांमध्ये उदयसिंह पाटील व कॉंग्रेसने केलेली विजयी घोडदौड व अनेक सोसायटींवरती मिळवलेली एकहाती सत्ता अनेकांच्या जिव्हारी लागली आहे. उदयसिंह पाटील यांचा होणारा राजकीय उदयअनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून अनेकांशी हातमिळवणी करून व एकी करून कोणत्याही स्थितीत होणाऱ्या प्रत्येक निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा व उदयसिंह पाटील यांचा पराभव करण्यासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय खेळी खेळण्याची तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्या हातात घ्यायची, अशा प्रकारचे डावपेच आखले जात असल्याचे चित्र कराड तालुक्यामध्ये दिसून येत आहे.
कोट्यवधीच्या उलाढालीमुळे वर्चस्वाची लढाई
कराड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाणारी आहे. गूळ, जनावरांच्या बाजारासाठी कराड शेती उत्पन्न बाजार समिती राज्यात प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर बाजार समितीने अन्य व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढविल्याने आता उलाढाल कोट्यवधीत गेली आहे. त्यामुळे ही बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी व तालुक्यावर फक्त आपलेच वर्चस्व राहावे, यासाठी तालुक्यातील दिगज्ज नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु, ही निवडणूक म्हणावी एवढी सोपी होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.