मुंबई : पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. पोलीसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे.
गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्याच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, सिंगापूर सारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीसी प्रशिक्षण बंधनकारक आहे. दहशतवादी कारवायांसाठी मुलांना वयाच्या ६-७ व्या वर्षांपासून प्रशिक्षित केले जाते. दहशतवादाचा सामना करायचा असेल तर यासंबंधीचे प्रशिक्षण शालेयस्तरापासून देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पोलीसांनी निःस्वार्थी, निःस्पृहपणे काम करुन त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्य पोलीस दलाला आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.
पोलीसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारे शूरवीर’ या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला पोलीस दलाचा गौरव केला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शंभूराज देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.