नागपूर – महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या आघाडीवर पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत, राज्यात कोठलीही आगळीक होऊ दिली जाणार नाही असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. मनसेने मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्यासाठी 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्या संबंधात गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, राज्याचे पोलिस महासंचालक या विषयावर सर्व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यांनी अहवाल दिल्यानंतर उपाययोजनांच्या संबंधात निर्णय घेतला जाईल.3 मे नंतर महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता गुप्तचर विभाने वर्तवली आहे का, असे विचारले असता गृहमंत्री म्हणाले,की अशी परिस्थिती निर्माण होईल असे मला वाटत नाही. आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि अनुचित घटना टाळण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
कोणत्याही वक्तव्याने किंवा कृतीने द्वेष निर्माण केला किंवा समाजातील शांतता बिघडली, तर संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवर त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही वळसे पाटील म्हणाले. राज ठाकरे यांना केंद्रीय सुरक्षा पुरवली जात असल्याच्या वृत्तावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की राज्यातील व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप होणे योग्य नाही. राज्य सरकारला डावलून केंद्र सरकार काही लोकांना सुरक्षा पुरवत आहे, ही गंमत आहे, असे ते कोणाचे नाव न घेता म्हणाले.