कराड – ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-सुरुर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा. तसेच कोकणला जोडणारा कराड-चिपळूण राष्ट्रीय मार्ग क्र.166 ई वरील पाटण ते संगमनगर धक्का रस्त्याचे काम नव्याने पूर्ण करावे, अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे केली.
ना. नितीन गडकरी हे शुक्रवारी नियोजित दौऱ्यानिनित्त सातारा जिल्ह्यात आले होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांनी त्यांची भेट घेऊन ह्या मागण्या केल्या आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी ना. गडकरी यांच्याकडे दिले आहे.
खा. श्रीनिवास पाटील यांनी म्हटले आहे, राज्य महामार्ग एस.एच.139 मुंबई-पुणे-बंगलोर ए.एच.47 ला सुरुर जि. सातारा ते मुंबई-गोवा एन.एच.-66 पोलादपूर जि. रायगड येथे वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर मार्गे जोडतो. हा रस्ता माझ्या लोकसभा मतदारसंघातील वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा प्रतापगड किल्ला असे अतिशय महत्त्वाची पर्यटनस्थळे जोडतो. पर्यटकांची वर्दळ जास्त असल्याने येथे सतत वाहतूक कोंडी होते. तर शनिवार व रविवार आणि सुट्टीच्या दिवशी परिस्थिती अत्यंत कठीण होते. पावसाळ्यात कनेक्टिव्हिटीवर विपरित परिणाम होतो. ज्यामुळे शेवटी पर्यटन आणि गावांच्या मूलभूत सोयी सुविधांवर परिणाम होतो. या परिसराचे पर्यटन व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, तसेच सातारा, रायगड जिल्ह्याच्या व्यापारी व औद्योगिक आघाडीवर सर्वांगीण विकासासाठी या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जावाढ करणे अत्यंत गरजेचे आहे.
केंद्र सरकारने हा रस्ता मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून या रस्त्याच्या विकासासाठी डीपीआर तयार केला आहे. तथापी तो महामार्ग क्रमांक नियुक्त केलेला नाही आणि एंट्रस्टमेंट गॅझेट अद्याप प्रकाशित केलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक द्यावा, जबाबदारीची राजपत्र अधिसूचना प्रकाशित करावी, डीपीआर मंजूर करावा आणि या रस्त्याच्या विकासासाठी लवकरात लवकर निधी द्यावा अशी विनंती खा. पाटील यांनी केली आहे.
तसेच कराड ते चिपळूण राष्ट्रीय मार्ग क्र.166 ई या रस्त्याचे पाटण तालुक्याच्या हद्दीतील एकूण 48 कि.मी. लांबी पैकी 34 कि.मी. रस्त्याच्या लांबीतील काम एल. ऍन्ड टी. कंपनीने पूर्ण केलेले असून उर्वरित 14 कि.मी रस्त्याच्या लांबीतील पाटण ते संगमनगर धक्का येथील मूळ अवस्थेतच आहे. सदर रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या 14 कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कामाची निविदा नव्याने काढावी व कार्यक्षम ठेकेदार कंपनीस हे काम द्यावे. म्हणजे दळणवळणाची अडचण दूर होईल. हा रस्ता कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांना जोडतो. विजापूर ते गुहागर असा मार्ग असून महाराष्ट्रातील सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातून हा रस्ता जातो.