अकलूज -आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत चौंडी ते इंदौर रेल्वे दवारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभुमी ते कर्मभुमी जोडण्याबाबतचे निवेदन दिले. तसेच माढा लोकसभा मतदार संघातील महत्वाचा प्रश्न म्हणून लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेमार्गाला गती देण्याची मागणी केली.
जेऊर-चौंडी-आष्टी हा 78 किमीच्या रेल्वे मार्गाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मागणीची दखल घेऊन सन 2016 मध्ये सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती. सन 2017 च्या अर्थसंकल्पात 1 हजार 560 कोटी रुपर्यांची तरतूद करण्यात आली होती.
जेऊर येथून निघालेला हा मार्ग आष्टी येथे अहमदनगर-परळी या मार्गाला जोडणे अभिप्रेत आहे. त्यामुळे पंढरपूर-करमाळा-चौंडी-आष्टी- अहमदनगर-शिर्डी-इंदौर असा नवा मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी जोडली जाणार असून अहिल्यादेवींनी जिर्णोद्धार केलेले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपुर बरोबर, श्री कमलाभवानी माता मंदिर, करमाळा व शिर्डी येथील साईबाबा देवस्थान ही जोडले जाणार आहे.
तसेच लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्गाची मागणी सातत्याने होते आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी वेळोवेळी केंद्रसरकारकडे पाठपुरावा केला आहे. सद्यस्थितीत लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला. पण त्यानंतरचा फलटण ते पंढरपूर हा जवळपास 105 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग अद्यापही अपूर्ण आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे प्रकल्पात राज्याचा सहभागाअंतर्गत पंढरपुर लोणंद रेल्वेमार्गासाठी 600 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने लवकरच उर्वरित निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.