तळेघर -आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात सहा वर्षापूर्वी माळीण गावावर दरड कोसळली होती. त्याप्रमाणेच पोखरी घाटातही दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हा घाट मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.
पोखरी घाटात अवघड वळणे व तीव्र उतार आहे. अरुंद रस्ता व दिवसेंदिवस घाटातून वाढू लागलेल्या वाहतुकीमुळे हा घाटरस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील पोखरी घाट. श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाण्यासाठी मंचर-भीमाशंकर हा एकमेव मार्ग आहे. या रस्त्यावर डिंभे गावच्या पुढे जवळपास 10 किलोमीटरवर घाट सुरू होतो. संपूर्ण घाटात सात अवघड वळणे लागत आहेत. या घाटातील वळणांवर अनेक ठिकाणी रस्त्याच्या वरच्या बाजू कमकुवत झाल्या आहेत.
अनेकदा या घाटात पावसाळ्यामध्ये दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम आदिवासी भागातील पोखरी घाट वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे येण्यासाठी भाविक याच मार्गाचा वापर करत असतात. सध्या करोनामुळे श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. तरीही स्थानिक नोकरदार वर्ग व काही कामानिमित्त येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ मुख्यत्वे याच घाटातून होत असते.
परंतु हाच घाटरस्ता आता घाटातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर उठला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दरडी काढण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक, प्रवाशांमधून होत आहे.
“माळीण’ होण्याची भीती
पोखरी घाटाच्या वरचा काही भाग खचल्यामुळे दरडीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. घाट माथ्यालगतच अनेक छोटी मोठी घरे वसलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी माळीण घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वेळीच काही पावले उचलली नाही तर घाटात दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे. दरडीचा काही भाग खचून रस्त्यावर आल्यामुळे घाटरस्ता हा निसरडा बनला आहे. यामुळे दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.