आंबेगाव बुद्रुक (प्रतिनिधी) – आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर परिसरात महानगरपालिकेच्या जागेत “थेट शेतकरी ते ग्राहक’, या धर्तीवर प्रत्येक शुक्रवारी आठवडी बाजार भरत होता. शेतकरी व बचतगट यामध्ये सहभागी होत होते. परंतु, या जागेवर आता मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने आठवडी बाजाराची जागाच हरवली असल्याने पुन्हा रस्त्यालगतच बाजार भरू लागला आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने बंद असलेला आठवडे बाजार आता सुरू झाला आहे. परंतु, बाजार भरत असलेल्या जागेमध्ये मोठे गवत उगवले असल्यामुळे शेतकरी व बचत गट धारकांना रस्त्यावरच आपले भाज्यांचे स्टॉल मांडावे लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी या बाजाराकडे पाठ फिरवली आहे.
दत्तनगर, आंबेगाव पठार, आंबेगाव बुद्रुक या भागात कायमस्वरूपी बाजारपेठ नसल्यामुळे किरकोळ विक्रेते उपलब्ध जागेत तसेच रस्त्यावरच भाजी विक्री करीत आहेत. यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडीही होत आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोमवार-कात्रज डेअरी परिसर, गुरुवार -थोरवे शाळा व शुक्रवारी-दत्तनगर, आंबेगाव पठार या ठिकाणी आठवडे बाजार भरवले जात आहेत. परंतु, सदर जागेत गवत उगवल्यामुळे बाजाराच्या जागेऐवजी रस्त्यावर बाजार भरवला जात आहे. यातून करोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी. बाजार भरत असलेल्या जागेवरील गवत काढून नियोजित जागी बाजार भरवण्याविषयी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
आठवडे बाजार भरत असलेल्या जागेत पावसामुळे गवत वाढले आहे. महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदर जागेची स्वच्छता त्वरित केली जाईल. बाजार पूर्ववत नियोजित जागेवर भरवला जाईल.
– युवराज बेलदरे, नगरसेवक, महानगरपालिका